"चाचा अल्लाह से वैभव के लिये दुवा मांगो. वो पहले की तरह ठीक होना चाहिए", दर्ग्याच्या बाहेर बाकड्यावर बसलेल्या चाचांना मी विनंती केली. ते बहुतेक तिथले मुख्य असावेत. वैभवला दर्ग्यामध्ये जाण्यासाठी शूज काढावे लागतील आणि पुन्हा घालायला त्रास म्हणून तो बाहेर त्या चाचांशी गप्पा मारत उभा होता. "हमने तो मन्नत मांग रखी है. वैभव हमारे भावकी का है. हम उसको अलग नही मानते. दर्गा का पुरा काम ऊसिने किया है. कूच काम रहेगा तो हम सुभाष (वैभवचे बाबा) को नहीं. वैभव को फोन करते थे. बच्चे की किस्मत मे ये क्या आ गया. ठीक तो ऊसको होना ही है. उसके अलावा हमको भी नहीं जमता", चाचांनी थोडस भाऊक होऊन आम्हाला सांगितलं.
फूणगुस हे आमच्या बाजूचं गाव. डिंगणी आणि फूणगुस मध्ये एक खाडी आहे आणि त्या दोन गावांना जोडणारा खाडीवरचा पुल. त्या पुलावर बरेच लोक संध्याकाळी फिरायला किंवा गळ टाकून मासे पकडायला येतात. वैभव हल्ली काही दिवस सुपरवायजर म्हणून फूणगुसमध्ये एका मुस्लिम फॅमिलीकडे काम पाहत होता. कोव्हिडच्या पहिल्या फेज मध्ये त्याला ब्रेनस्ट्रोक चा अटॅक आला आणि त्याचा डावा पाय आणि हात अधू झाला. जेमतेम पस्तिशितला. एवढा धडधाकट वैभव हतबल झालेला कुणाला पाहवत नव्हता. या एका घटनेने सगळे हळहळले. पण या दीडेक वर्षात त्याच्यात बरीच सुधारणा झाली होती. पूर्वी पाय सरकवत काठीचा आधार घेऊन चालणारा वैभ्या आता काठीशिवाय पाय उचलून चालतोय बघून बरं वाटत होतं. हातामध्येही काही प्रमाणात फरक जाणवत होता. फूणगुसच्या कामासाठी त्याला न्यायला आणायला गाडी होती किंवा गाडी नसेल तर कुणी ना कुणी घेऊन जायला असायचाच. आम्ही पुलावर फिरायला आणि त्याला आणण्याच्या निमित्ताने गेलो होतो तिथूनच दर्ग्यात जाण्याचा विचार केला. आमची दर्ग्यात जाण्याची ही पहिलीच वेळ. दर्ग्यामध्ये त्यांच्या रोजप्रमाणे प्रार्थना चालू होत्या. मकबऱ्याच्या बाजूला असणाऱ्या लाकडी स्टँडला वैभवसाठी मन्नत म्हणून वहिनीने धागा बांधला.
दर्ग्यातून निघाल्यावर पुन्हा पुलावर आलो. तिकडे कायम रिक्षा उभ्या असतात. तिथले सलमान, सायलू सारखेच कित्येक वैभवचे मित्र आणि चाचा. वैभवने हक्काने त्यांना गोष्टी मागाव्यात आणि त्यांनी त्या पूर्ण कराव्यात. वैभव बरा असताना तोही या प्रत्येकासाठी तितकाच उपयोगी पडला होता. "अरे सायलू, शामकु रॉड (फिशिंग रॉड) लेके आ. रातको मच्छी पकडते. अब किधरको जातास?", पुलावरून जात असलेल्या रिक्षाला थांबवत वैभवने विचारलं. "संगमेश्वरको जाके आता. आने के बाद फोन करता तेरेको", मोहल्यातल्या मुलांची भाषा बोलण्याची एक वेगळी शैली आहे. वैभव तिकडे असला की त्यांच्यातलाच एक असतो. हल्लीच मोहल्ल्यातल्या एका माणसाने जिल्हास्तरीय क्रिकेट सामने भरवले होते ज्यामध्ये पहिलं पारितोषिक लाख रुपयाचे होते. या साखळी सामन्याच्या सुरुवातीला वैभवचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याला स्वतःच्या हाताने जमत नाही म्हणून त्याचे शूज काढण्यासाठीसुद्धा मोहल्ल्यातली माणसं वाकली होती.
आईच्या श्राध्दासाठी घरी काही खुर्च्यांची गरज होती. तेवढ्या खुर्च्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये उपलब्ध होत्या पण पंचायत ऑफिस शनिवार असल्याने बंद होत. उशिरा संध्याकाळी आम्हाला खुर्च्या मिळाल्या त्यासुद्धा गावाच्या मशिदीमधून. घरात दहाएक दिवसांपूर्वी लग्न झालेलं त्याच्या मंडपाचे बांबू अंगणात तसेच उभे होते. त्यावर टाकायला कापड पण आम्हाला मोहल्यातल्या माणसाने दिलं. अगदी लहानपणापासून आम्हाला मोहल्यातली सगळी माणसे आमचीच वाटतात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांसोबत कसं वागावं हे गावाला समजत. "हिंदू मुसलमान यांच नातं काय असतं हे बघायचं असेल ना तर त्यांना इथली लोक दाखवायची. कसे एकमेकांसाठी वागतात हे लोक. पण काही लिहायला जा या विषयावर. मग बघ लोक सोशल मीडियावर याला कसे धर्मात बांधतील", माझी आणि दादाची चर्चा या गोष्टीबद्दल झाली तेव्हा दादा मला म्हणाला. "देअर आर फिव पीपल ऑन सोशल मीडिया, हू आर देअर टू क्रिएट न्यूसन्स व्हॅल्यू", महेश मांजरेकर कोणत्या तरी कार्यक्रमात हे वाक्य म्हणाले होते ते आठवलं. प्रत्येक धर्म मानवता शिकवतो. त्याचा विपर्यास करणारे जगात असेही सगळीकडे आहेतच.
Well said bro....proud to be Indian
ReplyDeleteThank you :)
Deleteकाल्पनिक वाटावं असच आहे...
ReplyDeleteसर्वत्र हे चित्र असतं तर किती छान असतं...
विशेषतः मुंबईत चित्र वेगळं आहे...
Hoy...Nakkich badalel...Saglyani prayatna kele tar :)
Delete