Skip to main content

रायगड

 


काही क्षण आयुष्यात खास असतात. त्या क्षणात आयुष्य पलटून देण्याची ताकद असते. माझ्या आयुष्यात तो क्षण जानेवारी २००९ मध्ये आला होता जेव्हा मी शाळेतल्या मित्रांसोबत पहिल्यांदा रायगडावर गेलो होतो आणि स्वतःची कंपनी चालू करण्याबाबत त्यांच्यासमोर विचार मांडला होता. जुलै २००९ मध्ये स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करणारी "स्वराज्य इन्फोटेक" आम्ही ५ मित्रांनी मिळून स्थापन केली होती. आज पुन्हा एकदा १२ वर्षांनी तोच क्षण जगण्याची आणि रायगड पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याची संधी मिळाली.


प्रोजेक्टच्या निमित्ताने दादाने रायगडावर जाऊ अशी कल्पना तीनेक दिवस आधी मला दिली. आम्हा दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतो त्यामुळे त्याला सहसा नाही म्हणणं मला जमत नाही आणि त्यात रायगड म्हटल्यावर नकाराची शक्यता नव्हतीच. सुनील दादा, समीर, मोहित ही सोबत होतेच. अख्खी रात्र गडावर काढायची या कल्पनेने आम्ही सगळेच हुरळून गेलो होतो. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जगदीश्वराच्या मंदिरात ध्यानसाधना करण्याचा भक्कम प्लॅनसुद्धा झाला होता. आम्ही दुपारी तीन-साडे तीन दरम्यान पोहचलो पण गडावर पोहचल्यापासूनच हिरमोड व्हायला सुरुवात झाली. कोव्हीडमुळे संध्याकाळी ५ नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ पर्यंत गडावर जायला बंदी होती. पूर्वीसारखं गडावर रात्री राहताही येणार नव्हतं. आमचे सगळेच शेड्युल बिघडणार होते.





रोप-वेच्या बाजूलाच गडावर राहण्याची सोय होती. एका खोलीत दोघे-तिघे झोपतील अशी व्यवस्था होती. आम्ही २ रूम बुक केले. पण पुढे काय हा प्रश्न होताच. फ्रेश होऊन तिथल्या गार्डची थोडा जास्त वेळ गडावर थांबू देण्यासाठी परवानगी मागितली. गडावर दुसरं कुणीच नसल्याने लवकर परत येण्याच्या कबूलीवर त्यांनी आम्हाला जाऊ दिलं. आम्ही आनंदाने त्यांना धन्यवाद बोलून तिथून निघालो. गडावर राहणारी गावातली माणसं अधूनमधून भेटत होती. जेवणाची आणि नाश्त्याची विचारपूस सगळ्यांकडूनच होत होती. त्यांच्या उत्पन्नाचं हे एक साधन असावं. कोव्हीडमध्ये त्यांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज येत होताच. ही अधूनमधून भेटणारी माणसं सोडली तर कायम गजबजलेल्या या गडावर फक्त आम्हीच होतो.



राणीवसाच्या बाजूने चालत आम्ही दरबाराकडे आलो. बरीच पडझड झालेली असतानासुद्धा रायगडाची श्रीमंती अजूनही लपून राहत नाही. या सगळ्या वाटेवर महाराज आणि जिजाऊ येऊन गेले असतील किंवा काही जागांना त्यांचा स्पर्श झाला असेल या विचारानेच भारल्यासारखं होत होतं. इथेच महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला असेल याचं चित्र विचारांमध्ये उभं राहात होतं. आम्ही गडावर येईपर्यंत हलका हलका पाऊस येत होता. पण आता तो पूर्ण थांबला होता. मध्येच हलक्या धुक्यामध्ये गडावरचे पडझड झालेले वाडे झाकले जात होते. काहीवेळा ढग आमच्या आजूबाजूला फिरत आहेत अशीच फिलिंग येत होती. दरबारात महाराजांच्या सिंहासनाजवळ नतमस्तक होऊन थोडा वेळ थांबलो. "रोज ठाण्यावरून महाराजांच्या गळ्यातला हा हार न चुकता येतो", तिथे ड्युटीवर असणाऱ्या सेक्युरिटी गार्डने आम्हाला माहिती दिली. महाराजांच्या गळ्यातला तो मोठा फुलांचा हार बघून मला या गोष्टीच प्रचंड कौतुक वाटलं आणि त्यासोबतच जे कुणी हे करत असेल त्याला या गोष्टीचा किती अभिमान वाटत असेल याची कल्पना आली. राजदरबाराच्या बाहेर नगारखान्याच्या दरवाजावर उभं राहिल्यावर जगदीश्वराचे मंदिर समोरच्या टेकडीवर दिसत होतं. सकाळी लवकर मेडिटेशनसाठी मंदिरात जाता येणार नाही यांचं दुःख होतं. तिथून चालत जाऊन बाजारपेठ पालथी घातली. गायी म्हशी पुन्हा त्यांच्या गोठ्याकडे निघाल्या होत्या. दोन्ही बाजूला बाजारपेठेची तुटलेली काळ्या दगडांची दुकाने आणि मधून धुक्यात चालत येणारी ती जनावरं हे दृश्य मनाला विसावा देणारं होतं. कोणत्याच ठिकाणावरून पाय निघत नव्हता. जिथे जाऊ तिकडे शांत आणि प्रसन्न वाटत होतं. पण काळोख व्हायला लागला होता. गारठाही प्रचंड जाणवत होता. सकाळी पाऊस पडायला लागला तर काहीच करता येणार नाही अशी चर्चा होत असतानाच 'महाराजांनीच इकडे आणलं आहे तर तेच मार्ग दाखवतील', या विश्वासाने आम्ही पुन्हा रूमकडे आलो.


सकाळी सात वाजता जेव्हा आम्ही पुन्हा एकदा गडाकडे निघालो तेव्हा आम्ही ढगांच्याही खूप वर आहोत असं दृश्य आम्हाला दिसलं. रायगडाच्या आजूबाजूला दाट ढगांमध्ये कुठे कुठे सह्याद्रीच्या डोंगरांची टोकं वर दिसत होती. एकदम कुणीतरी कापूस पिंजून ठेवावा असंच ते दृश्य. यापूर्वी फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा असं पाहिलं होतं पण हे दृश्य अगदीच वेगळं होतं. रायगड किती उंच आहे याची प्रचिती आजूबाजूच्या पर्वतांना पाहिल्यावर सहज येत होती. रायगडासोबतच तेसुद्धा संपूर्ण इतिहासाचे साक्षीदार. डोळ्यात जितकं साठवता येईल तितकं साठवून आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालो. बरीच नवीन लोकं गडावर आली होती. ती तिथे पोहचण्याआधी आम्हाला मंदिरात मेडिटेशन पुर्ण करण्याची ईच्छा होती. मंदिरात कुणीही नव्हतं. काही पक्ष्यांचे अधूनमधून आवाज सोडले तर प्रचंड शांतता होती. मंदिराच्या गाभाऱ्यात सगळीकडे पाणी पसरलं होतं. तिथे बसणं मुश्किल असल्याने महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून आम्ही समोरच असणाऱ्या महाराजांच्या समाधीकडे आलो. तिथल्या संपूर्ण वातावरणात प्रचंड पोजिटिव्ह व्हायब्रेशन्स जाणवत होते. महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन आम्ही तिथेच बैठक घेतली आणि मेडिटेशनला सुरुवात केली. एरवी बऱ्याच वेळाने लागणारी धुंदी त्या वातावरणात काही क्षणातच लागली. पुढचा कितीतरी वेळ त्या वातावरणाचा आनंद आम्ही ध्यानसाधनेतून घेतला. महाराजांच्या सानिध्यात असल्याची भावना सकारात्मक ऊर्जा देणारी होती.


रायगड फिरताना निसर्गाची किमया, अगदी चित्रात रंगवल्यासारखे वाटणारे आणि कुणीतरी चिनी हातोडी घेऊन कोरल्यासारखे आर्टिफिशिअल वाटणारे पर्वत, टकमक टोकावरून ती इवलीशी दिसणारी घरं-झाडं-नद्या, रायगडासमोर माना झुकवून उभे असल्याप्रमाणे दिसणारे छोटाले डोंगर, मधूनच धुक्याच्या ढगांमध्ये हरवून जाणारी संपूर्ण जमीन या सगळ्यांसमोर आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होत होती. १२व्या शतकात विजयनगर साम्राज्यात असणारा रायगड, निजामशाहीत जाऊन १६४८ साली स्वराज्यात आला. हिरोजी इंदुलकरांनी त्या किल्ल्याचा केलेला कायापालट व त्याची संपन्नता त्या वास्तूमध्ये आजही जाणवते. १८१८ मध्ये इंग्रजांनी गडाचा ताबा मिळवून रायगड उध्वस्त केला आणि प्रचंड तोडफोड केली. १७ दिवस रायगड जळत होता. 'शरीर मरतं, पण विचार नाहीत' असंच काहीसं रायगडाचं झालं. रायगडची भव्यता आजही तीच आहे. रायगड आपल्या महाराजांचा इतिहास आपल्यासमोर जिवंत करतो. मावळ्यांची एकनिष्ठता, तेव्हाची लोकं आजही आपल्या नजरेसमोर उभी राहतात. महाराजांनी ३४ वर्षात उभारलेल्या अशक्यप्राय स्वराज्याची ग्वाही आजही रायगड आपल्याला तितक्याच तन्मयतेने देतो.
भरल्या डोळ्यांनी आणि निढळ निश्चयाने नव्याने काहीतरी करण्याचा निर्णय घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

- सुबोध अनंत मेस्त्री

छायाचित्रे : Sameer Padwal Vinod Mestry

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी