तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करावे लागणार नाहीत किंवा मुळात तुमचे कपडे कधी खराबच होणार नाहीत. त्यावर कोणतेही डाग पडणार नाहीत. इस्त्री जर का फिरलीच तर तुमच्या कपड्यांचा रंग बदलण्यासाठी फिरेल. म्हणजे एकच शर्ट तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये वापरू शकाल. नॅनोटेक्नॉलॉजी बद्दल अच्युत गोडबोलेजींच्या "नॅनोदय" पुस्तकात असं बरंच काही वाचलं होतं. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता मार्केटमध्ये येऊ घातल्या आहेत. जेव्हा एखाद्या सुपरफिशिअल सिनेमामध्ये पाहिलेल्या गोष्टी अशा पुस्तकात वाचायला मिळतात आणि ते खरं होऊ शकत हे पटवून देतात तेव्हा एक वेगळीच मजा असते.
असं काहीतरी वेगळं वाचायला मिळेल या अनुषंगाने अजाने दिलेलं निळू दामले यांचं "टेक्नियम" हे पुस्तक वाचायला घेतलं. त्यात टेकनॉलॉजीचा तसा मागोवा सुरुवातीपासून दिसला नाही. अख्ख पुस्तक टीव्हीबद्दल च्या सर्वेवरच मांडलेलं होतं. म्हणायला तसा हिरमोड तर झाला नाही कारण हा प्रवास बघणार्यांपैकी मीसुद्धा एकच. पण हाच प्रवास भारतातील वेगवेगळ्या खेडेगावात जाऊन त्यांनी १९९८ आणि २००८ साली केला आणि त्याचं उत्तम वर्णन या पुस्तकातुन मांडलं आहे.
पूर्वीच्या काळी टी.व्ही. म्हणजे श्रीमंताचं लक्षण पण तो हळूहळू पाहूणा म्हणून खेड्याखेड्यात शहरात प्रत्येक घरात घुसला आणि प्रत्येक घराचा सदस्य होऊन बसला. ज्या घरात पूर्वी मातीने अंघोळ केली जायची ती जागा हळूहळू साबणाने घेतली. टीव्हीवरील जाहिराती बघून शॅम्पू घरात यायला लागले. कंपन्यांनी खेडेगावातील वाढतं मार्केट लक्षात घेऊन सॅचेट फॉरमॅट मध्ये गोष्टी विकायला सुरुवात केली आणि ते सामान्य माणसांच्या बजेट मध्ये आल्यामुळे त्यांचा खप प्रचंड वाढला. हळूहळू डेली सोप्स टीव्हीवर सुरु झाले आणि मग त्यात नटनट्यांनी वापरलेले कपडे, त्यांची हेअरस्टाइल, त्यांचे दागिने या प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड सुरु झाला. दुकानांमध्ये फेमस सिरियल्सच्या नटनट्यांचे कपडे, चपला दागिने येऊ लागले. दुकानात जाऊन फक्त अमुक अमुक सिरियलच्या या पात्राचे कपडे पाहिजे सांगितलं कि ते हव्या त्या साईझ मध्ये मिळायला लागले. ब्युटी पार्लर्स गल्लोगल्ली चालू झाली आणि त्यांचीही चालती चालू झाली. माणूस एकमेकांना बघून तसं वागण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी गावागावातल्याच सीमा असल्याने आणि प्रवास तितका सोपा नसल्याने माणसं आपल्या समाजाप्रमाणे किंवा आजूबाजूंच्या लोकांप्रमाणे वावरत होती. पण टीव्हीने जग घरामध्ये आणून ठेवलं. आणि खेडीपाडी मॉडर्न व्हायला सुरुवात झाली. ज्यांच्या घरी जेवणाची आबाळ असेल पण घरात शॅम्पू सॅचेट नक्की असणार असा किस्साही त्यांनी यात मांडला आहे.
टीव्हीमुळे समाज बिघडतोय किंवा टीव्हीमुळे नको त्या गोष्टी घरातल्या सगळ्यांसमोर येतात वैगेरे अशी बरीच आरडाओरड सुरुवातीला झाली आणि हीच आरडाओरड गेल्या काही वर्षांपासून मोबाईलच्या बाबतीतही आहेच. प्रत्येक नव्या गोष्टीच्या आहारी आपण जातो. एखाद्या नव्या गोष्टीवर प्रचंड शंका कुशंका काढायच्या व नंतर बाकीचे वापरत आहेत म्हणून हळूहळू स्वतः वापरायला सुरुवात करायची ही जुनी भारतीयांची सवय. त्यामुळे तंत्रज्ञानातल्या नवनवीन गोष्टींचे इनोव्हेशन बऱ्यापैकी बाहेरच्या देशातच झाले आहेत. त्यामुळे आपल्या देशाला फक्त कन्ज्युमर मार्केट म्हणूनच पाहिलं जात. हे त्यांचं मत काही अंशी पटलं. टीव्हीमध्ये आता नावीन्य राहिल नाही. पण टीव्ही आणि मोबाईलला इंटरनेट जोडलं गेलं आणि पुन्हा एकदा जग आपल्या बोटांशी आलं. ओ. टी. टी. किंवा टिकटॉक रिल्स सारखे नवनवीन प्रयोग आता व्हायला लागले आहेत. त्यामुळे बऱ्याच अंशी माणसं सध्या मोबाईल बाबतीत व्यसनाधीन आहेतच. पुढील काही वर्षात मोबाईल जरी नसेल तरी ती जागा दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीने नक्कीच घेतली असेल.
पुस्तकाच्या शेवटी त्यांनी जे मांडलं होतं ते भन्नाटच. नॅनोटेक्नॉलॉजीबद्दल बरेच आर्टिकल्स व्हिडीओज पहिले असल्याने त्याबद्दल माहिती होतीच. पण मेडिकल क्षेत्रात नॅनोटेकनॉलॉजीमुळे होणारेबदल विचार करायला लावण्याजोगे होते. जसं की, त्यांनी नॅनोबॉट्स बद्दल एक माहिती सांगितली. नॅनोबॉट्स म्हणजे सुईच्या टोकावर हजारोंच्या संख्येने मावतील असे सूक्ष्म रोबोट्स. हे रोबोट्स माणसाच्या शरीरामध्ये सोडले की ते पूर्ण सेक्युरिटीचं आणि डॉक्टरांचं काम करतील. जसं कि, हृदयाच्या झडपेमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः दुरुस्त करतील किंवा नजीकच्या हॉस्पिटल्सही संपर्क साधून योग्य ती प्रक्रिया लगेच अजमावून पाहतील. कॅन्सरच्या पेशी तयार होण्याआधीच हे बॉट्स त्यांना संपवून टाकतील. शरीरात कुठेही काही गडबड दिसली की हे नॅनोबॉट्स त्याची काळजी आधीच घेतील त्यामुळे माणसाचं आयुर्मान वाढू शकतं. २१व्या शतकाच्या शेवटाला माणसाचं आयुर्मान २५०-५०० वर्ष सुद्धा होऊ शकेल. हा सगळा निसर्गाशी खेळ नक्कीच आहे. याचे परिणाम-दुष्परिणाम हि नंतरची गोष्ट. पण असं काहीतरी होऊ शकतं हेच कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. काही गोष्टी अगदी न पटण्यासारख्या असल्या तरी तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे की यातली कोणतीही गोष्ट पुढील काही वर्षात अशक्य नाही.
शेवटी, "तंत्रज्ञान श्राप कि वरदान" हे त्याचा आपण कसा वापर करू यावर अवलंबून आहे.
- सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment