"हॅलो, कशा आहात बाई?", नुकत्याच आलेल्या चौधरी बाईंच्या मिसकॉलवर मी रिटर्न कॉल केला होता. बाई म्हणजे माझ्या सातवीच्या वर्गशिक्षिका. माझ्या सगळ्यात आवडत्या. एकदमच. आमच्या वेळी टीचर आणि मॅडमच फॅड आमच्या शाळेत नव्हतं आणि अजूनही सगळ्या शाळेतल्या शिक्षिकांना आम्ही बाई म्हणूनच बोलवतो. कॉलेजपासून मॅडम सुरू झालं. पण बाई शब्दातला आपलेपणा मॅडम मध्ये नाही. बाई बोलताना कायम "आई" बोलतोय असं वाटायचं.
"मी, बरी आहे बेटा! तू आहेस कुठे? मी किती वेळा फोन केला. तू माझा फोन उचलत नाहीस. अगोदर अधून मधून फोन करत होतास. मी प्रविणला (आमचे मेस्त्री सर) फोन केला होता. त्याला पण सांगितलं, माझा सुबोध मला असा कसा विसरला? मी फोन करून कंटाळले बाबा. आता त्या भगवंतांचीच इच्छा असेल म्हणून फोन लागला बघ इतक्या दिवसांनी.", राग प्रेम सगळं त्यांनी एकदाच व्यक्त केलं.
बाईंचा फोन आला हे मला आठवत नव्हतं पण हेसुद्धा खरं होतं की मी त्यांना समोरून गेल्या वर्षभरात फोन केला नव्हता. पूर्वी अधूनमधून त्यांना माझा सतत फोन असायचा. आई गेली त्या काळात बरेच फोन माझ्याकडून मिस झाले असतील. त्यात बाईंचाही असू शकेल. बाईंना तेच कारण सांगून त्यांची समजूत घातली. माझ्या सांत्वनासाठीच त्यांनी मला फोन केला होता. आईची बातमी ऐकून त्यांना वाईट वाटलं होतं. "अगोदर बिचारीने मेहनत केली आणि आता पोराबाळांकडून खायचे आणि आराम करायचे दिवस आले आणि परमेश्वराने नेलं बघ तिला", बाई माझी समजूत काढत होत्या. त्याकाळी बाई आमच्या चाळीतल्या घरी येऊन गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आई भेटली होती. अधूनमधून अशीही भेट व्हायचीच. बाईंची तब्येत हल्ली ठीक नसते. मागे फोन करायच्या तेव्हाही त्यांनी मला ते सांगितलं होतच. मी भेटायला येईन असं त्यांना कबुलही केलं होतं. पण सततच्या कामांनी आणि नंतरच्या सततच्या लॉकडाऊनमूळे गोष्टी जुळून येत नव्हत्या. आणि शेवटी राहायचं ते राहूनच गेलं. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात. त्याला ३-४ वर्ष उलटून गेली असतील. त्यानंतर फक्त फोनवरच बोलणं व्हायचं.
"खूप मोठा हो. अजून बरंच काही तुला करायचं आहे. यश तुझ्या वाटेत नक्की आहे बाळा. तुझी मेहनत कमी पडू देऊ नको. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहतील. सुनेची आणि नातवाची काळजी घे. त्यांना पण खूप आशीर्वाद. या दिवसात भेटणं शक्य होत नाही पण फोन करत राहा बेटा. तुझ्याशी इतक्या दिवसांनी बोलून बरं वाटलं बघ.", सतत शुभेच्छांचा वर्षाव होत राहिला.
"काळजी घ्या बाई. मी येईन भेटायला नक्की", काही संभाषणामध्ये आपण निशब्द होऊन जातो. माझं तसं काहीसं झालं. फोन कट झाला. "तुम्हाला कसा विसरेन बाई? सातवीत घरची परिस्थिती बेताची आणि क्लास लावू शकत नाही म्हणून मी नऊमाई परीक्षा मी नापास झालो होतो तेव्हा तुम्ही हात देऊन मला अगदी मोफत सगळं शिकवून वार्षिक साठी तयार केलं होतं. त्या वर्षी मी वर्गात सातवा आलो. गणिताची एवढी भीती होती की मी आठवी गाठेन असं वाटत नव्हतं. आठवीला इंग्रजी कठीण म्हणून तुम्ही माझ्या वाढदिवसाला दिलेलं इंग्रजी विषयाचं गाईड मला कामी आलं. तुम्ही त्यावेळी माझ्या आयुष्यात केलेलं योगदान तुमच्यासाठी लहान असेल पण माझ्यासाठी प्रचंड मोठं होतं", फोन ठेवल्यावर मी स्वतःशीच विचार करायला लागलो. नंतर बाईंशी संपर्क काही ना काही निमित्ताने होत राहिला पण गेल्या वर्ष दीड वर्षात माझ्याकडून काहीच संपर्क झाला नाही.
"कधी कधी आपण आपल्यात आणि आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये एवढे हरवून जातो की आजूबाजूच्या आपल्या जगाचा आणि आपल्या माणसांचा कॉन्टॅक्ट कमी होत जातो. सुरुवातीपासून आपल्या आयुष्यात असे कित्येक जण येऊन गेले असतील ज्यांनी आपल्या आयुष्याला स्पर्श केला, आपल्यासोबत चांगले मोमेंट्स शेअर केले, आपल्या बाबतीत कायम चांगला विचार केला. पण हळूहळू काही ना काही निमित्ताने आपला संपर्क कमी होत गेला. आपल्या कळत नकळत आपण त्यांच्यापासून लांब गेलो. एक फोन करायला आणि विचारपूस करायला कितीसा वेळ लागतो? काहींना फक्त आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे हे आपल्याकडूनच कळावं अशी माफक अपेक्षा असते.", बाजूला बसलेल्या अजाला फोन ठेवल्याठेवल्या मी असं बरंच काही सांगायला लागलो आणि पुढच्याच क्षणी पुन्हा एकदा माझ्या कामात गढून गेलो.
"रिकामी घरं नेहमीच तुम्हाला हरवलेली नाती दाखवतात. प्रेमाच्या अभावाची जाणीव करून देतात. सत्य तर हे आहे, की नेहमीच पैसा सर्व काही नसतो. - अज्ञात
-सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment