========================================
परवा सहज माझ्या रुपेश नावाच्या मित्राबरोबर चर्चा करताना पोलीसांचा विषय निघाला. त्याच्या कारमधला ऑडिओ सिस्टम चोरीला गेल्यानंतर त्याला ठाण्यातल्या वर्तक नगर पोलीस स्टेशनमधील "श्री. ज्ञानेश्वर आव्हाड" नावाच्या पोलीस अधिकारी साहेबांनी कशी मदत केली हे तो सांगत होता. त्यावेळी बेदरे सरांची आठवण आली. बेदरेसर हे माझ्या आयुष्यातले पहिले पोलीस ऑफिसर ज्यांच्याशी मी समोरासमोर भेटलो आणि बोललो. त्याअगोदर पोलिसांबद्दल माझं मत काही खास चांगलं नव्हतं. त्यानंतर एखाद वर्षांनी संजय गोविलकर दादा भेटले आणि खाकीमागच्या खऱ्या प्रेमळ माणसांची भेट झाली.
========================================
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी जॉबला लागल्यानंतर मामाचा मुलगा श्याम पहिल्यांदाच मुंबईमध्ये आला होता. घरात पार्टी व्हावी म्हणून पावभाजी घेण्यासाठी आम्ही बाईकवर दोघेही चेंबूरला सदगुरू रेस्टोरंटमध्ये गेलो होतो. सदगुरुची पावभाजी खूपच फेमस आहे. चेंबूरला पार्किंगचा नेहमीचाच इश्यू. त्यात सदगुरु एकदम स्टेशनबाहेरच नाक्यावर असल्याने तिथे तर गाडी लावायला चान्सच नव्हता. हॉटेलपासून थोड्या अंतरावर आम्ही जाऊन बाईक लावली आणि हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी गेलो. पार्सल येण्यासाठी बराच उशीर लागला. पार्सल रेडी होतंय पाहिल्यावर बिलिंग होईपर्यंत मी श्यामला बाईक हॉटेलसमोर आणायला बाईकची चावी दिली. मी पार्सल घेऊन निघेपर्यंतच शाम धावत माझ्याकडे आला.
"अरे पोलिसांनी गाडी पकडली. चावी घेतलान माझ्याकडून", श्यामू घाबरला होता. मला कळायला काही मार्ग नव्हता. हॉटेलसमोरच एक पोलीस चौकी आहे. तिथेच पकडली असणार याचा अंदाज होता. आम्ही पार्सल घेऊन लगेच बाहेर गेलो. हवालदारसाहेब रस्त्यापलीकडे समोरच होते आणि बाईक त्यांच्या बाजूला लावली होती. आम्ही रस्ता क्रॉस करून त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी पोलिसांशी संबंध यापूर्वी केव्हाच नव्हता आणि पोलीस त्रास देतात ही नकारात्मक भावना इकडून तिकडून ऐकून तयार झाली होतीच.
"साहेब, काय झालं?", मी विचारलं.
"कोण तू?", माझ्या बाजूला श्यामला बघून त्यांनी चढ्या आवाजात विचारलं.
"मी भाऊ याचा. गाडी माझी आहे", मी शांतपणे उत्तर दिलं.
"लायसन्स आहे का याच्याकडे? वाकडी तिकडी गाडी चालवत होता. ठोकला असता कुणाला म्हणजे?", त्यांनी पुन्हा त्याच सुरात मला दरडावणी सुरु केली. मला बाईक चालवायला श्यामूने शिकवली. तो वाकडीतिकडी गाडी चालवेल यावर माझा विश्वास बसला नाही. पण तो होता शॉर्टवर. त्याच्याकडे लायसन्स नसावं हे त्या हवालदारांनी हेरलं असावं.
"साहेब, माझ्याकडे आहे लायसन्स. गाडी मीच आणली होती आणि मीच नेणार होतो. हॉटेलमधून पार्सल मिळायला लेट झालं म्हणून त्याला इथून हॉटेलपर्यंत आणायला सांगितलं होतं", मी लायसन्स आणि नंतर हातातलं पार्सल त्यांना दाखवत समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते काही ऐकायला तयार नव्हते. मी फाईन भरायला तयार होतो पण त्यांनी फाईन सुद्धा 2000 सांगितला. इतका फाईन नसावा याचा मला अंदाज होताच. मी मधल्यामध्ये तोडगा काढून त्याना काहीतरी द्यावं अशा सुरात त्यांची बोलणी सुरु झाली पण त्यासाठी मी तयार नव्हतो. शेवटी हवालदार वैतागले. त्यांनी एक शेवटचा बाण माझ्यावर मारून बघितला, "फाईन नसेल भरायचा तर साहेबांसमोर उभा करीन. नंतर केस झाली तर निस्तार मग". मी फाईन भरायला तयार असताना केस का होईल या आत्मविश्वासाने मीसुद्धा तयार झालो. हे त्यांना अनपेक्षित होतं. रागातच आम्हाला आतमध्ये घेऊन गेले. लोक पोलिसांना नाव का ठेवतात याचा अनुभव आता मला स्वतःला मिळत होता.
चौकी फारच लहान होती. पुढे एक नऊ बाय नऊचा रूम आणि मागे एक छोटा रूम. तो त्यांना कपडे बदलण्यासाठी असावा. टेबलवर साहेब बसले होते. बसल्यानंतरही त्यांची उंची कळत होती. गोरा वर्ण, कुरळे केस पण उजव्या बाजूला पाडलेला भांग, दाट मिशा, नाकावर आलेला चौकोनी चष्मा. एका इन्स्पेक्टरला शोभावा असाच तो रुबाब. नेमप्लेटवर "बेदरे" हे नाव चटकन डोळ्यात भरलं. ते टेबलवर असणाऱ्या फाईलवर काहीतरी लिहीत होते. आत गेल्या गेल्या हवालदार साहेबांनी सगळी कहाणी साहेबाना रंगवून सांगितली. मी आवाज चढवून बोलतो असही सांगितलं. साहेबानी काम चालू ठेवून मध्येमध्ये हुंकार भरत सगळं ऐकून घेतलं. हवालदारांचं सांगून झाल्यावर साहेबानी त्यांना बाहेर जायला सांगितलं. अतिशयोक्ती त्यांच्या लक्षात आली असावी.
"नाव काय तुमचं?", साहेबांनी पुन्हा फाईलमध्ये लिहिता लिहिता विचारलं. मी माझं नाव सांगितलं.
"काय करता तुम्ही सुबोधजी?", एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना आणि वयानेही माझ्यापेक्षा मोठे असतानासुद्धा ते मला एकेरी हाक मारत नाहीत याचं कौतुक वाटलं.
"सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे सर", मी सांगितलं.
"आय.टी. वाले ग्राहकांना लुटून एवढे पैसे कमावतात आणि मग चुका केल्यावर गव्हर्नमेंटला फाईन भरायला काय हरकत असते तुमची?", त्यांनी उपहासात्मक स्वरात मला विचारल. मी त्यांना सगळी घटना समजावून सांगितली आणि मी फाईन भरायला तयार आहे पण जास्त फाईन सांगितला हे त्यांना सविस्तर सांगितलं. त्यांना परिस्थिती लक्षात आली.
"ठीक आहे. जा तुम्ही. यापुढे असं करू नका. विदाउट लायसन्स गाडी चालवणे गुन्हा आहे", बेदरे सर हसून म्हणाले. इतक्या सहज हे निपटेल याची मला कल्पना नव्हती. मी पुढे काही बोलणार इतक्यात दोन माणसे भांडण करीत आत आली. साहेबांनी मला स्माईल देऊन निघण्याच खुणावलं. आम्ही निघालो. त्यांना धन्यवाद बोलायचं राहून गेलं होतं.
असाच एकदा चेंबूरला गेलो असताना बेदरे साहेब आत बसलेले मी पाहिले. मी त्यांची परवानगी घेऊन आत गेलो. सरांनी मला ओळखले नाही. मी त्यांना त्यादिवशीची आठवण करून दिली.
"आठवलं. बसा सुबोधजी. ए शिंदे, सदगुरुमधून मोसंबी ज्यूस घे एक इकडे. मोसंबी चालेल ना?", त्यांनी मला विचारलं. मी नको म्हणत असताना त्यांनी ऑर्डर केलीच. "बोला सुबोधजी, कसं येणं केलंत?"
"सर तुम्ही त्यादिवशी आय. टी. बद्दल म्हणत होतात. पण सगळीच लोकं तशी नसतात सर", मी विषयाला हात घातला.
"होय सगळेच पोलिसही तसे नसतात", त्या धीरगंभीर चेहऱ्यावरचं हास्य खूप डॅशिंग असायचं.
"होय सर. म्हणूनच आवर्जून तुम्हाला भेटायला आलो. यापुढे आय. टी. रिलेटेड काही मदत लागली तर आवर्जून कॉल करा सर. मला आवडेल जर माझी काही मदत तुम्हाला झाली तर", असं म्हणून खिशातल्या एका कागदावर मी त्यांना माझा नंबर लिहून दिला. त्यांनीही त्यांचं कार्ड मला लगेच शेअर केलं. इकडच्या तिकडच्या गप्पा करून ज्युस घेऊन मी निघालो. त्यापुढे जास्त वेळा स्टेशनला जाणं झालं नाहीं आणि गेलो तेव्हा सर दिसले नाहीत.
एकदा अचानक रात्री त्यांचा फोन माझ्या मोबाईलवर आला. "सुबोधजी, आपली मदत हवी आहे. कुठून एखादा प्रिंटर अरेंज होईल का? उद्या कोर्टात सुनावणी आहे आणि आता मार्केट बंद झालं आहे. चौकीतला प्रिंटर बंद पडला आहे", त्यांनी सविस्तर मला सिच्युएशन समजावून सांगितली. सुदैवाने माझ्या घरीच प्रिंटर होता. मी घेऊन येतो सांगितल्यावर त्यांनी ऍड्रेस विचारला आणि सरळ आमच्या चाळीबाहेर पोलिसांची गाडी पाठवून दिली. तेव्हा तो प्रिंटर घेऊन गाडीत चढताना चाळीतल्या लोकांसमोर माझा रुबाब काही औरच होता. मी चौकीत जाऊन सरांना सगळं सेट करून दिलं आणि निघून आलो. दुसऱ्या दिवशी दुपारी सरांचा "थँक यु फॉर युअर हेल्प" असा मेसेज आला आणि संध्याकाळी प्रिंटर माझ्या घरी. नंतर अधून मधून सहज कॉल होत राहिले. एकदा माझा मोबाईल हरवला असताना सर स्वतः मला मुख्य चौकीत त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये बसवून घेऊन गेले होते आणि माझं काम करून दिलं होतं.
हळूहळू संपर्क खूप कमी झाला. मीही माझ्या रुटीन लाईफमध्ये गेलो आणि सरांचीही बदली झाली. दोन वर्षांपूर्वी पोलीस ट्रैनिंग चालू झाल्यावर मी आवर्जून सरांना फोन केला आणि सर नेमके दौंड पोलीस ट्रैनिंग सेंटरला फॅकलटी आहेत असं समजलं. तिकडे गेल्यानंतर आवर्जून त्यांना भेटलो. त्यांचा पाहुणचार अजूनही तसाच होता आणि पर्सनॅलिटीसुद्धा.
माणूस लक्षात राहतो तो त्याच्या कर्तृत्वामुळे किंवा स्वभावामुळे. पुढे पोलीस ट्रैनिंगमध्ये बेदरे सरांसारखी बरीच खाकी वर्दीमागची माणसं भेटली. पण बेदरे सरांची छाप मनावर कायम आहे.
#sahajsaral
खूप सुंदर लेख लिहिला आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मला आठवतय आपण चेंबूर स्टेशन ला एकदा गेल्यावर असच आपण त्या चौकीत सरांना भेटायला गेलो होतो पण सर न्हवते.
ReplyDeleteमागे हे सगळं घडून गेलं होतं आता ते पुन्हा आठवलं आणि तू ते शब्दात खूप सुंदररित्या उतरवलं आहेस.
खरंच माणसे ही त्यांच्या स्वभामुळे आणि कर्तृत्वामुळे.
खूप सुंदर लेख लिहिला आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मला आठवतय आपण चेंबूर स्टेशन ला एकदा गेल्यावर असच आपण त्या चौकीत सरांना भेटायला गेलो होतो पण सर न्हवते.
ReplyDeleteमागे हे सगळं घडून गेलं होतं आता ते पुन्हा आठवलं आणि तू ते शब्दात खूप सुंदररित्या उतरवलं आहेस.
खरंच माणसे ही त्यांच्या स्वभामुळे आणि कर्तृत्वामुळे.