Skip to main content

अर्धांगिनीस पत्र



10 वर्ष !!!  2007 ते 2017.

किती वेगळं आहे हे सगळं.  आपण प्रेमात काय पडलो...लग्न मोडता मोडता झालं काय आणि आता लग्न होऊन 10 वर्ष झाली.  किती सहज निघून गेली इतकी वर्षे.  आता आठवलं तर खरच इतका काळ लोटला आहे का असा प्रश्न पडावा इतक्या सहज.  

मला तो दिवस अजून आठवतो जेव्हा तू सकाळी 7 वाजता चेंबूरच्या आपल्या घरी मला सांगायला आली होतीस की आपलं लग्न होऊ शकत नाही.  त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुझ्या घरी आपल्याबद्दल समजल्यामुळे त्यांनी विरोध केला.  तुझ्या आईसाठी तू इमोशनल झाली होतीस.  त्या दिवशी किती रडली होतीस तू?  तुझं रडणं थांबावं म्हणून मी माघार घेतली आणि सांगितलं नाही करायचं लग्न.  (थोडक्यात हे मोडल्यासारखंच झालं).  हा सगळा प्रकार बघून माझ्या आईला टेन्शन.  तिला वाटायचं ही याच्या आयुष्यातून गेली तर हा देवदास होईल.  मग मी नंतर ऑफिसला सुट्टी टाकली.  मग 3-4 तास आपण एकत्र घालवल्यावर तुझा विचार पलटला आणि लग्न करायचंच असा ठाम निर्णय मला सांगितलास.  केवढे होतो आपण तेव्हा?  फक्त 21-22 वर्ष.  मी नोकरीला लागून नुकतेच 5-6 महिने झाले होते आणि पगार फक्त 5 हजार.  तुझा निर्णय परत घरी जाऊन बदलेल असं मला वाटलं होतं पण नाही झालं तसं.  तुझे पप्पा लग्नाची बोलणी करण्यासाठी माझ्या घरातल्याना भेटायला तयार नव्हते आणि मग तुझं लग्न ते परस्पर ठरवायला निघाल्यावर आपल्याकडे पर्याय नव्हता.  इतक्या लवकर लग्न व्हावं अशी माझी ईच्छा नव्हती पण लग्न करा किंवा विषय सोडून द्या अशी परिस्थिती आली.  मग निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता.  तुझ्यासारखी मला समजून घेणारी दुसरी मुलगी मिळणार नाही हे माझं मत होत (ते आजही तसच आहे.  दुसऱ्या कुणी मला आणि माझ्या वेडेपणाला कस सहन केल असत हा प्रश्न आहेच). कोर्ट मॅरेंज साठी 14 फेब्रुवारी तारीख ठरली.  

मी सहज विचारायचं म्हणून परागला आपल्या पत्रिकेबद्दल त्याच्या बाबांशी बोलायला सांगितलं होतं.  परागचे बाबा लग्नपत्रिका बघतात हे मला माहित होत.  परागला पण थोडं फार त्यातलं कळत होत आणि पत्रिका पाहिल्याबरोबरच त्याने सांगितलं की, "भारी मित्रा.  तुमच्या दोघांचे 36 च्या 36 गुण जुळतात."  मी भयंकर खुश झालो.  पण तो रात्री बाबांना पत्रिका  दाखवून कन्फर्म करणार होता.  मी रात्री निकालाची वाट पाहत सुभाषनगरच्या मैदानामध्ये  बसलो होतो.  पराग चा कॉल आला पण तो नाराज वाटत होता.  त्याने बाबांना फोन दिला.
"पत्रिका जुळत नाही.  36 गुण जुळतायत पण पत्रिकेत दोष आहे.  लग्न करणं योग्य नाही. पुढे मुलाबाळांसहित सगळे त्रास येणार", बाबांनी एकाच वाक्यात सगळं सांगून टाकलं.  तसा माझा विश्वास नव्हता या गोष्टींवर पण तूझ्या सांगण्यावरून मी ती पत्रिका दाखवली होती.  जेव्हा तूला मी ते सांगितलं तेव्हा पुन्हा एकदा तू ठाम होतीस.  "होईल ते बघू.  बाबांकडून उपाय घेऊ", ही तुझी वाक्य.  म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपलं लग्न व्हायचं होतच तर.

अगदी 13 तारखेपर्यंत नक्की नव्हतं की उद्या आपल लग्न होईल.  असं काहीतरी वेगळं आपल्या घरातल्यानी कधीच केलं नव्हतं त्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती होतीच.   दादाने तर विडाच उचललेला की लग्न व्यवस्थित पार पाडायचं.  अप्पांचे मित्र विजय काका यांनी या गोष्टीसाठी सपोर्ट दाखवला आणि दोन तीन मित्रांच्या अशा लग्नाचा अनुभव असल्याने धीरही दिला.  

"मुलगी नक्की तयार आहे का?  म्हणजे लग्नानंतर पोलीस कम्प्लेंट करावी लागते.  मुलीच्या घरातल्याना बोलावतात.  त्यात जर मुलीने स्टेटमेंट आपल्या विरोधात दिली तर तुझ्याबरोबर जेवढे लग्नाला होते तेवढे सगळे आत जातील किडण्यापिंग च्या केस मध्ये", विजय काकांनी हे सांगून धक्काच दिला होता.  तसं मला माझं टेन्शन नव्हतं पण घरातल्याना आणि मित्राना माझ्यामुळे त्रास होऊ नये अशी ईच्छा होती.  तू एकदा यात उडी घेतल्यावर मागे फिरणार नाहीस याबाबत माझा तुझ्यावर विश्वास होता आणि मी ते दादाला सांगितलेलं.  दादाने सांगितलं, "जे होईल ते बघून घेऊ.  फक्त प्रतिभाला डिसीजन सोडू नकोस सांग".

आदल्या दिवशी 13 तारखेला रात्री आई आणि मी जाऊन तुझ्यासाठी साडी आणि माझ्यासाठी शर्ट घेतला. हीच काय ती लग्नाची खरेदी.  आईने एक मंगळसूत्र बनवून ठेवलं होतच.  तशी आई खूप भित्री आहे पण याकाळात सगळ्यांकडेच एक वेगळीच एनर्जी होती.

सकाळी 7 ला तू नेहमी ऑफिसला निघायचीस तशी रेशनकार्ड घेऊन निघालीस.  7.30 ला कुर्ल्याला भेटायचं ठरलं होतं.  प्रत्येक कामात मी तुला गिफ्ट दिलेला मोबाईल उपयोगी पडत होता.  मी लग्नाचं जास्त कुणाला सांगितलं नव्हतं.  पण मित्रांपैकी अजय, तानाजी, पराग, जागृती हे आवर्जून येणारच होते आणि त्यांना सांगणं भागच होत.  दादाने त्याच्या मित्र मैत्रिणींना बोलावलं होत. लग्नाचे फोटो प्रूफ म्हणून लागतील म्हणून आपली पहिली लग्नाची ऑर्डर रूपेशला मिळाली.  तुझ्याकडून फक्त नम्रता आली होती.  कुर्ल्यावरून बसने आपण बांद्रा कोर्टात पोहचलो.  तिथे सगळी तयारी या सगळ्यांनी आधीच करून ठेवली होती.  आधी वैदिक पद्धतीने लग्न आणि मग कोर्टात जाऊन रजिस्ट्रेशन हा प्लॅन होता.  दादाने संजय गोविलकर दादांशी बोलून सगळी सेटिंग आधीच लावली होती.  एका छोट्याशा मंदीरात आपल्याबरोबरच अजून 3-4 जणांची लग्न होती.  तू मंदिरात आल्या आल्या आत तयारीला गेलीस.  आम्ही कितीही हसत खेळत होतो तरी मनात धाकधूक होतीच.  तुझ्या घरातल्याना कुठूनही समजलं आणि ते आले तर सगळं विस्कटणार होत.  भटजी पण आपल्याला अँटिक भेटला होता.  त्याने युपी बिहार स्टाइल मध्ये मंत्र बोलायला सुरुवात केली आणि तो जे काही मध्ये मध्ये सांगत होता ते मला काहीच कळत नव्हतं.  तू आलीस आणि नंतर लक्षात आलं की आपण मुंडावळ्या आणल्या नाहीत.  दादा अण्णाने धावत जाऊन कुठून तरी मुंडावळ्या आणल्या तोपर्यंत अर्ध अधिक लग्न उरकलं होत.  सप्तपदी तर आपण जवळ जवळ पळतच पूर्ण केली.  तुला मंगळसूत्र घालताना पुढे आयुष्यात काय होणार आहे त्याची काहीच कल्पना नव्हती.  मुलाचा मामा लग्नाच्या विधींसाठी  लागतो आणि योगायोगाने कमलाकर मामा गावावरून त्याच दिवशी आला होता.   सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले.  लग्न पार पडलं. कोर्टात जाऊन रजिस्ट्रेशन करताना काही न्यूज चॅनेलवाले तिथे होते.  14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने ते बरेच जण लग्न करतील असा त्यांचा अंदाज होता आणि ते जोडप्यांचे इंटरव्यू घ्यायला आले होते.  त्यावेळी आपल्याला लपवण्यासाठी सगळ्यांची चाललेली धडपड अजून आठवते.  दोघांनी तर मुद्दाम आपल्या गळ्यातले हार मागून घेतले आणि कॅमेरासमोर उभे राहिले.  रजिस्ट्रेशन झाल्यावर लग्नाचं जेवण कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये.  आपण मसाला डोसा खाल्ला होता.  

सगळ झाल्यावर महत्वाचा भाग बाकी होता.  तो म्हणजे पोलीस एन सी.  आपण सगळे तसेच बसंत पार्क पोलीस चौकीत गेलो.  विजय काका आणि आप्पा आत बोलायला गेले.  तुला बाहेरूनच तुझ्या घरी कॉल करायला सांगितलं.  तू फोन केलास तो तुझ्या आईने उचलला.  "आई, मी सुबोधशी लग्न केलंय", तुझ्या पहिल्या वाक्यातच ठामपणा होता.  आईसाठी नक्कीच तो धक्का होता.  नंतर कॉल अमितने घेतला आणि साहजिकच तो तुझ्यावर वैतागला पण तू मागे हटली नाहीस.  तुझा माझ्यावरचा विश्वास त्यादिवशी मला ठळक दिसला.  नंतर आपल्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं  गेलं.  हवालदार काका भयंकर गंभीर चेहऱ्याचे होते.  ती माझी आणि तुझी कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची पहिलीच वेळ.  हवालदार काकांनी एन सी लिहून घेतली आणि नंतर सब इन्स्पेक्टर साहेबांसमोर बसलो.  त्यांनी आपल्या समोर पुन्हा तुझ्या घरी फोन केला व लग्नाबद्दल कल्पना आहे का ते विचारलं.  काही आक्षेप असल्यास पोलीस स्टेशन ला या असही सांगितलं.  पण तुझ्या घरातल्यांनी गोष्टी मान्य केल्या व काही हरकत नसल्याचं सांगितलं.  आपण पोलीस स्टेशन मध्ये पेढे वाटायला सुरुवात केली.  बऱ्याच सिनिअर पोलिसांनी तोंडभरून आशीर्वाद दिला.  एक इंस्पेक्टर तर तुला म्हणाले होते, "तू मला मुलीसारखी आहेस.  याने काही त्रास दिला तर माझ्याकडे यायचं".  हा एन सी प्रकार जितका कठीण वाटला होता तितका झाला नाही.  तुझ्या ठामपणामुळे सगळं सुरळीत पार पडलं.

मग आपण घरी आलो.  चाळीत नेमक्या त्याच दिवशी पाणी लेट येणार असल्याने सगळ्या बायका बाहेर बसल्या होत्या.  मी आम्हा भावांमध्ये तिसरा आणि पाहिलं लग्न केलं म्हणून बऱ्याच टीका माझ्या माथी त्यावेळी आल्या.  चाळीत बातमी वाऱ्यासारखी पसरली.  "एवढी घाई होती काय रे? आधी भावाचं तरी होऊन द्यायचं" ही वाक्य तर माझ्या नेहमीच कानावर.  पण दुनियेची फिकीर मी कधीच केली नव्हती.  संध्याकाळी तुझ्या घरातल्यानी आमच्या घरी फोन केला आणि "प्रतिभाला घरी पाठवा आपण थोड्या दिवसांनी सगळ्यांना सांगून त्यांचं लग्न लावून देऊ असं सांगितलं".  तुझ्या घरातले खरच साधे असल्याने आपल्या घरातल्यानी आढेवेढे घेतले नाहीत.  सगळ्यांना लगेच तोंड कस देणार म्हणून तू घरी जायला घाबरत होतीस पण मैदानात उतारलोय तर लढुया अशा भावनेने तू तिकडे निघून गेलीस. नंतर पूर्ण 3 महिने तू तिकडेच होतीस आणि एक दिवस चांगला मुहूर्त बघून तुला इकडे पाठवल.  त्या 3 महिन्यात तू आपल्या प्रेमासाठी काय सहन केल असशील याची जाणीव मला आहे.  

त्यानंतर पण जवळपास आतापर्यंत तू खूप काही सहन केलंस.  माझ्या स्ट्रगलमध्ये मला तुझ्यासाठी काहीच करता नाही आलं.  तुझ्याही अपेक्षा कधी मोठ्या नव्हत्या.  तू माझं जग हळूहळू तुझं जग करत गेलीस आणि माझी प्रत्येक व्यक्ती तुझी झाली.  आजही आपण भांडतो पण ते सहसा मीच केलेलं असत.  आपण बोलणं बंद करतो पण माघार अजूनही तूच घेतेस.  तू इतक्या वर्षात स्वतःला खूप बदलत गेलीस आणि नवीन गोष्टी शिकत गेलीस.  तुला नाटकात काम करताना आणि पहिल्यांदाच नाचताना बघणं खरच खूप कौतुकास्पद होत.  आता तू तुझी जी ईच्छा आहे ती मला स्पष्ट बोलून दाखवतेस आणि माझाही प्रयत्न असतो की ती पूर्ण होईल.  तुला जे वाटत ते कर.  आयुष्याची पूर्ण मजा घे.  तू अशा वेळी माझ्या आयुष्यात आलीस जेव्हा मी कुणीच नव्हतो, आजही नाही पण तुझा सपोर्ट माझ्यासाठी कायम काहीतरी करून दाखवण्याची स्वप्न जागृत करतो.   तू माझ्यासोबत आहेस हीच माझ्यासाठी ग्रेट फिलिंग आहे.  अजून लग्नाच्या वाढदिवसाची बरीच दशकं आपल्याला एकत्र साजरी करायची आहेत.  त्यामुळे प्रत्येक गोष्टीत स्वतःची काळजी घेत जा.  कारण तू मला खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहेस.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

तुझा,
सुबू


#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...