Skip to main content

आभार - ०९ जून २०१८

*!!! आभार !!!*

९ जून १९८५.  मध्यरात्री २ च्या सुमारास शताब्दी हॉस्पिटल चेंबूर इथे माझा जन्म झाला. शौच नलिकेत त्रास असल्याने माझं ऑपरेशन करणं गरजेचं होतं.  पण ऑपरेशन नंतर बाळाला ठेवण्यासाठी जी काचेची पेटी लागते ती शताब्दी हॉस्पिटलमध्ये नव्हती.  त्यामुळे ताबडतोब के.ई.एम हॉस्पिटलला हलवाव लागेल नाहीतर जीवाला धोका आहे असा ईशारा डॉक्टरने दिला. आमचे शेजारचे खोत भाई त्यावेळी शताब्दीमध्ये कामाला असल्याने त्यांच्या ओळखीवर लगेच अँबुलन्स मिळाली व मला ताबडतोब के. इ. एम ला हलवलं.  तिकडे उपचार करून पुढचे ९ दिवस मी काचेच्या पेटीतच होतो.  माझ्यासोबत अजून अशी पाच सहा मुलं तशाच पेटीत होती आणि त्यातला मी बचावलो अस आई सांगते.  देवाने नक्कीच काहीतरी घडवून आणण्यासाठी मला मागे ठेवला असं मला कायम वाटत राहीलं.  पण नेमकं ते काय हे अजून गवसायचं बाकी आहे.

त्यावर्षी तुफान पाऊस होता.  बेडची व्यवस्था नसल्याने बाळंतपणातच आईला जमिनीवरच चादर टाकून झोपावं लागायचं.  त्यात अधूनमधून सारखी ती उठून त्या पेटीजवळ जाऊन मला बघत राहायची.  तिच्या किती प्रार्थना देवाकडे गेल्या असतील याचा हिशोब नाही.  इतक्या तुफान पावसात पप्पा कामावरून घरी येऊन सगळं जेवण बनवून चेंबूरपासून रोज के. ई. एम ला घेऊन जायचे.  दादा अण्णा तेव्हा खूप लहान होते.  शेजाऱ्यांच्या किंवा घरी राहत असणाऱ्या काकांच्या जीवावर त्या दोघांना टाकून पप्पांना हे करावं लागत होतं.  काचेच्या पेटीत मुलाला अशा अवस्थेत बघताना दोघांच्या जीवाची काय घालमेल होत असेल त्याचा विचार आजही अंगावर काटा आणतो.

मी घरात लहान असल्याने माझे लहानपणापासून खूप लाड झाले.  जी खेळणी दादा अण्णांला कधी मिळाली नाहीत ती मला मिळाली.  माझे बरेचसे हट्ट पुरवले गेले.  माझं बालपण आईचा पदर पकडूनच गेलं.  आमची खाण्यापिण्याचीे आबाळ झाली किंवा खूप गरीबीत आम्ही वाढलो असं कधी घडलं नाही.  पप्पांच सुतारकाम आणि हातावर पोट असूनसुद्धा आई पप्पांनी आमच्यावर ती वेळ येऊ दिली नाही.  संस्कारात कुठे कमी पडू दिली नाही.  घरात येणाऱ्या कोलगेटची ट्यूब संपायला आल्यावर ती भिंतीच्या टोकावर घासून, नंतर चमच्याने घासून, अगदी शेवटी शेवटी पुढच्या बाजूला ट्यूब थोडी कापून त्यातून पेस्ट बाहेर काढणं आणि नंतर ती ट्यूब व तीच झाकण जपून ठेवून, अशी बरीच झाकण जमा झाली की चाळीत येणाऱ्या फेरीवाल्याकडून खारी टोस्ट विकत घेणं हा आमच्या आईचा व्यवहारिक स्वभाव.  मग तो सगळ्याच बाबतीत.  "आहे तर एकदाच खाऊ नका आणि एकटेच खाऊ नका" ही तिची शिकवण.  रात्री कुणीही अचानक जेवणाच्यावेळी आला की तो कधी उपाशी जायचा नाही.  एक दोन व्यक्तींचं जेवण कायम जास्तीच असायचंच. व्यवहारज्ञान पूर्ण तिच्याकडूनच शिकलो.  अगदी आजही शिकतो.  मन मारून आयुष्यभर जगली.  आता कुठे काही चांगलं होईल असं वाटतंय तेव्हा बाहेर फिरू शकत नाही इतकं आजारपण.  तिच्यासाठी खूप काही करावंसं वाटत पण तिला ते शक्य होत नाही.  त्यावेळी काचेच्या पेटीत मला बघताना ती जितकी हतबल झाली असेल तितकाच आज तिला बघताना मी रोज होत असतो.  आई बाबांनी आपल्याला वाढवलं, योग्य संस्कार शिक्षण दिलं हे त्यांचं कर्तव्य नाही तर आपल्यावरचे उपकारच. 

आई बाबांसारखीच खूप माणसं मला देवाने आजूबाजूला दिली.  अगदी नावं घेतली तर लिस्ट संपायची नाही.  कधी कधी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मी अशा व्यक्तींमध्ये राहतो ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे,  माझ्या प्रत्येक यशावर ते माझ्यापेक्षा जास्त हुरळून जातात,  माझं कौतुक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या करायला ते कधीच मागेपुढे करत नाही, चुकलो की तोंडावर बोलून दाखवतात.  काही जणांना व्यक्त होणं जमत नाही पण त्यांच्या वागण्यातून आणि नजरेतून कळतंच. या व्यक्ती फक्त माझ्या घरात नाहीत तर आजूबाजूला सगळीकडे आहेत. मी रोज त्यांच्यामध्ये जगतो, आयुष्य एन्जॉय करतो आणि त्यामुळेच कायम चार्ज राहतो.  मी आज जो कुणी आहे त्यात सगळा हातभार या व्यक्तींचा आहे. 

गेल्या वर्षभरात माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.  "टेक आय टी इजिअर" चालू होणं असेल किंवा दूरदर्शनवर दोन वेळा लाईव्ह न्यूजवर येणं असेल किंवा "महाराष्ट्र बिजनेस क्लब" नव्याने सुरू करणं असेल किंवा आमची ग्रुप आणि फॅमिलीसोबत झालेली पहिली फॉरेन टूर असेल किंवा आमच्या एका नव्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना असेल किंवा गेले काही वर्ष डोक्यात असणारा  पण आता प्रत्यक्षात उतरलेला "टेक आय टी इजिअर" चा युट्युब चॅनेल असेल (ज्याला फक्त 9 दिवसात जवळपास 650 सबस्क्राइबर मिळाले) किंवा "लाईफ रिचार्ज" सारख्या संजय गोविलकर दादांच्या कल्पनेतून जन्मलेल्या जीवनरंगच्या उपक्रमाचा मी स्वतः एक भाग होणं असेल.  खूप काही नवीन आणि उत्साह देणारं.  निगेटिव्ह गोष्टींना तर आम्ही असेही डोक्यावर घेत नाही कारण त्यांना महत्व दिल्यानेच त्यांची पॉवर वाढते. 

पण मी जे काही घडतोय किंवा जे काही चांगलं माझ्या आयुष्यात घडतं ते फक्त आणि फक्त आई बाबांच्या पुण्याईने, देवाच्या कृपेने आणि तुमच्यासारखी खरोखरच जीव लावणारी आणि नेहमी उत्स्फूर्त करणारी माणसं आहेत म्हणूनच.  आम्ही पैशात यश कधीच मोजलं नाही पण माणसात नक्कीच मोजतो.  मी दरवर्षी  माणसांनी श्रीमंत होतोय हे तर नक्की.  एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल आयुष्यावर असणारं एवढं मोठं आर्टिकल आपण का वाचावं? असा प्रश्न असतानासुद्धा तुम्ही ते पूर्ण वाचताय यातच तुमचं माझ्यावरच प्रेम आलं.

माझ्या वाढदिवशी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.  माझं अस्तित्व फक्त तुमच्यामुळे आहे.  तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहिलात आणि यापुढेही राहाल अशी आशा करतो.

असंच प्रेम कायम असू द्या 😊🙏🏻

तुमचाच,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी