Skip to main content

बी. डी. डी. चाळ



*बी. डी. डी. चाळ*
- सुबोध अनंत मेस्त्री

==========================================================

संजय दादा आणि अरुण सरांशी शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये  मिटिंग संपवून दादा आणि मी टॅक्सी मिळेल या हिशोबात शिवाजी पार्क समोरच्या शिवसेनाभवनाच्या रस्त्याला लागलो.  एक दोन टॅक्सीवाल्याना विचारलं पण नेहमीप्रमाणे नकारच मिळाला.  पलीकडच्या रस्त्यावरून एक टॅक्सी शिवाजी पार्ककडे चालली होती त्यांनी आम्हाला हातवाऱ्यानेच कुठे अस विचारलं.  मी लांबूनच "वडाळा  स्टेशन" अस मोठ्याने ओरडून सांगितलं.

"थांबा, वळवून आणतो", त्याने हात फिरवून सांगितलं.

"काका थोडे सिरीयस दिसतात या धंद्यामध्ये", मी मस्करीत दादाला म्हटलं.  टॅक्सी फिरून आमच्याकडे आली.

"बसा", त्यांनी मागचा दरवाजा उघडला.  आम्ही बसलो.

"मघाशी एवढं आभाळ आलं होत वाटलं पाऊस येईल.  आलाच नाही.   ढग आले तसे गायब झाले", गाडी सुरू झाल्या झाल्याच टॅक्सी ड्रायव्हर काकांनी गप्पा मारायला सुरुवात केली.

"पनवेलला पडला पाऊस दीड तास तरी.", दादाने सांगितलं.

"अरे वा तिकडे पडला का?  मग येईल इकडे पण हळू हळू.  गर्मी वाढलीय हो भरपूर.  चिडचिड होते", गाडी प्लाझा रस्त्याला लागली.

"काका रहायला कुठे तुम्ही", दादाने त्यांच्या वयाचा अंदाज घेऊन काका अशी हाक मारली असावी.

"आम्ही?  बी डी डी चाळ", त्यांनी सांगितलं.

"अरे वा बी डी डी", या चाळीत बराचसा मित्र परिवार राहून आलेला असल्याने आणि चाळ या शब्दाशी जुनं नात असल्याने तोंडातून "वा" तर आपसूकच निघतो.

"आमचं त्यात काही नाही हो.  आमच्या बाबानी घेतलेली.  आम्ही फक्त सांभाळतोय आता",  काकांनी सांगितलं.

"माझा कार्यक्रम झालेला तिकडे आणि जांभोरी मैदानात गुढीपाडव्याच्या एका कार्यक्रमात निवेदन केलं होतं मी.  स्मिता तळवलकर आल्या होत्या ना त्या कार्यक्रमाच.  मित्र पण आहेत तिकडे अजून आमचे.", दादाने बी डी डी चाळीच नात असल्याचे संदर्भ दिले.

"हो.  कार्यक्रम तर होतच असतात तिकडे.  संस्कृती जपून ठेवलीय चाळीने.  आता शंभर वर्षे पूर्ण होतायत चाळीला.  2024,  25 आणि 26 ला तीन चाळीना 100 वर्ष पूर्ण होतील.  ब्रिटिशांनी बांधल्या होत्या त्यावेळी.  पण खिळा जात नाही सहज अजून.  ड्रिल मशीन ने होल मारायचा म्हटल तरी 25 रुपये घेतात एका होलचे.  पाना तुटला तर दीडशे",  काका अभिमानाने सांगत होते.

"हो बघा ना.  जुनी बांधकाम किती मजबूत होती.  आताच्या बिल्डिंग कुठे अशा",  मी त्यांना दुजोरा दिला.

"मग मस्त बांधकाम.  त्यावेळी त्यांच्या सैनिकांना राहण्यासाठी बांधल्या होत्या.  मस्त दोन बिल्डिंगच्या मध्ये जागा त्यामुळे मुलांना खेळायला पण मिळत.  आम्ही पूर्वी पिक्चर लावायचो.  सफेद पडदा शिवून आणायचो मोठा 70 एम एम स्क्रीन.  हनुमान जयंती ला असायचाच.", काका नॉनस्टॉप चालू होते.

मी खूप लहान असताना मला आमच्या चाळीबाहेरच्या रस्त्यावर मोठ्या पडद्यावर लावलेला साईबाबांचा सिनेमा आठवला.  रस्त्याच्या एका बाजूला अर्धी लोक आणि दुसऱ्या बाजूला अर्धी आणि मध्ये पडदा.  ओपन थिएटर मध्ये मल्टिप्लेक्स ची मजा आम्ही तेव्हा घेतली होती.

"अजूनही असतात का चाळीत सण तसेच", मी काकांना कुतूहलाने विचारलं.

"हो मग.  अजूनही सगळे सण होतात.  साई भंडारा, हनुमान जयंती सगळे सण मिळून साजरे करतो आम्ही", काका एक्साइट झाले होते.

'आता पूर्वीसारखं कुठे राहिलय', या उत्तराची अपेक्षा असताना काकांच्या अनपेक्षित उत्तराने मला चाळीच कौतुक वाटलं.

"पण आता चाळ तोडण्याच चालू आहे.  टॉवर होतायत तिकडे", काकांच्या बोलण्यात थोडी नरमाई आली.  "मी म्हणतोय कशाला पाहिजेत टॉवर?  आताच्या रूम तशा आहेत लहान पण एवढा नाही होत प्रॉब्लेम.  चाळीबाहेरच्या ओट्यावर झोपलोय आम्ही किती वेळा.  माझ्याकडे तर पाहुणे आले तर मी सरळ गच्चीवर झाडू मारतो, चटया गोधड्या टाकतो आणि तिकडे जाऊन झोपतो त्यांना घेऊन.  वरळी चौपाटी बाजूलाच ना.  असला सो सो वारा येतो.  मस्त झोप लागते.  पाहुणे विचारतात मग एवढा सो सो वारा येतो कसा काय तुमच्याकडे?", त्यांच्या सो सो या शब्दाला एक वेगळीच टोन होती.

"आता अजून पण काय गरज पडली ना तर पैसे नसतील तरी चालतात.  दुकानात जाऊन सरळ सामान उचलून आणायचं.  कोण विचारत बसत नाही पैशाच.  काय पाहिजे नाही पाहिजे चाळीतले लोक काळजी घेतात.  टॉवर आल्यावर कोण बघणार ते?",  वडाळा स्टेशन येऊन आम्ही टॅक्सीतुन बाहेर आलो तरी काकाच्या गप्पा चालू होत्या.  उतरल्यावर त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसला.  बारीक पण पांढरे केस, थोडा उतरलेला सावळा चेहरा.  टॅक्सी ड्रायव्हरचा खाकी युनिफॉर्म आणि वरच एक बटन उघड.  साधारण चाळीशी पन्नाशीतला माणूस.  दादा आणि मी त्यांना हात मिळवून निघालो.

काकांनी पुन्हा एकदा त्यांच्या गप्पांमधून चाळ फिरवून आणली होती.    लहानपणी उत्साहात साजरे केले जाणारे सण मग ती हनुमान जयंती असेल, दिवाळीतले कार्यक्रम असतील किंवा नवरात्रीचा गरबा असेल  सगळे डोळ्यासमोरून गेले.  चाळीतल्या माणसांची एकमेकांबद्दलची आत्मीयता आठवली.  भांडण असून सणवार एकत्र साजरं करण आठवलं.  चाळ कोणतीही असो पण चाळीतल ते मोकळं वातावरण आणि कुणाच्याही घरी केव्हाही बिनधास्त घुसता येण्याच स्वातंत्र्य फ्लॅटच्या बंद संस्कृतीत हरवून गेलंय.

==========================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी