एकदा गौरी रडतच दादाजवळ आली. "दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे." तिचा रडवेला चेहरा बघून दादाने विषयाच गांभीर्य ओळखलं. "बाजूच्या रूम मध्ये जाऊन बसू. तिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही", अस म्हणून दादा तिला बाजूच्या रूम मध्ये घेऊन गेला. दादाने तिला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि तो समोरच्या बाकावर बसला. "बोल काय झाल?" गौरी मान खाली घालूनच बसली होती. दादाने विचारल्यावर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके देऊन ती रडायला लागली. दादाही तिला काही बोलला नाही. बऱ्याच वेळेला रडल्यानंतरच मन मोकळं होत. थोड्या वेळाने ती शांत झाली. दादाने तिला पाणी दिल. थोडी शांत झाल्यावर तिने सांगायला सुरवात केली.
"दादा, काल माझ्या हातून खूप मोठी चूक झाली रे. माझ आणि पप्पाचं काल घरात जोरात भांडण झाल. एवढं कि चाळीतीले लोक जमा झाले. ते मला प्रत्येक गोष्टीत अडवत असतात. हे करू नको ते करू नको. मी लहान पणापासून सगळं सहन केलं पण आता ते नाही होत. काल जरा जास्तच जोरात वाजलं. मी पप्पाना अरे तुरे केलं इथपर्यंत प्रकरण गरम झालं होत. त्यांनीही मला शिवीगाळ केला आणि मीही वाटेल तसं बोलली. पण मला आता कसंतरीच वाटतंय रे. ते घरी कुणाशी काही बोलत नाहीत आणि मीही नाही. मला कळतंय मी चुकीची वागलीय पण मी काय करू आता?" एवढं बोलून तिला पुन्हा रडू कोसळलं.
दादा थोडावेळ शांत झाला. नंतर तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला, "हे बघ. जे झालय ते मुळात चुकीचं आहे हे तुला पटतंय हि महत्वाची गोष्ट आहे. आज तू पप्पांशी भांडलीस, त्यांना वाटेल तस बोललीस याच्या मागच कारण तुझा राग असेल पण तस वागण्यामागे तुझ्या पप्पाची भावना काय असेल याचा विचार केलास का? ते तुला कोणतीही गोष्ट करण्यापासून परावृत्त करतात कारण त्यांना तुझी काळजी वाटत आणि ती जगातल्या कोणत्याही बापाला वाटण स्वाभाविकच आहे. ते जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करतात. तू सुरक्षित रहाविस अशीच त्यांची अपेक्षा असते."
गौरी ने मध्येच आडकाठी करत म्हटलं, "नाही रे दादा. त्यांचं नाही माझ्यावर प्रेम. ते फक्त माझ्या भावावर प्रेम करतात कारण तो मुलगा आहे आणि मी मुलगी आहे. माझ्या पप्पानी मला लहान पणापासून कधीच बोलून नाही दाखवलं कि त्यांचं प्रेम आहे माझ्यावर."
दादाने पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं, "तू बोलून दाखवलस त्यांना कधी?" तिने नकारार्थी मान हलवली.
"प्रत्येक गोष्ट आपल्या पालकांनी आपल्यासाठी कराव्या अशीच आपली का इच्छा असते? आपण त्यांची मुलं म्हणून आपलं काही कर्तव्य नाही? काही माणसं नसतात तेवढी एक्सप्रेससीव्ह. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. जास्त करून बाबा तसेच असतात. ते आतून भरभरून प्रेम करतील तुझ्यावर पण बोलून दाखवणार नाहीत अजिबात. तुला कोणती गोष्ट करताना अडवण्यामागे त्यांचा काय हेतू असेल? तुला त्रास देण?" तिने पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली.
दादा पुढे सांगत होता, "जर त्यांचा हेतू तुला त्रास देण हा नसेल तर मग तुझी काळजी एवढाच असू शकतो. तू कोणत्या संकटात अडकू नयेस असच त्यांना वाटत असेल. त्यांचा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे कि त्यांना ती गोष्ट तुझ्यासमोर व्यवस्थित मांडता येत नाही. आणि त्यामुळेच तूला त्यांची प्रत्येक गोष्ट अडथळा वाटत असेल आणि तू त्यांचं ऐकत नसल्याने ते अजून चिडत असतील." तिला कुठेतरी थोडं हलकं वाटायला लागलं होत. ती आता रडायची थांबली होती.
"पण मी आता काय करू दादा? माझे पप्पा आता माझ्याशी कधीच बोलणार नाहीत". दादाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होत,"हा तुझा त्यांच्याबद्दलचा ग्रह आहे. या जगातला कोणताही बाप असा नाही जो स्वतःच्या मुलांशी कायम बोलणं टाकेल. हो पण फक्त सुरुवात तुला करावी लागेल. कारण ते मोठे असल्याने बऱ्याच वेळेला माफी मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येऊ शकतो. लहानपणी आपण चुकलो आणि आपली प्रत्येक चूक त्यांनी पदरात पाडून घेतली. आता जर ते कुठे चुकत असतील तर त्यांना आपण नको का समजून घ्यायला? पूर्ण आयुष्य त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी काढली आणि आता ते एवढीही अपेक्षा नाही करू शकत का मुलांकडून? तू आता फक्त एकच काम कर. मनापासून त्यांना सॉरी बोल. बाकी सगळं आपोआप होईल. सॉरी या शब्दामध्ये नात जपून ठेवण्याची ताकद आहे."
"पण एवढ्याने हा प्रॉब्लेम सुटेल अस मला नाही वाटत. माझे पप्पा खूप रागीट आहेत. त्यांच्या मनातून एकदा कुणी उतरलं कि ते कायमच." गौरी अजूनहि प्रश्नातच होती.
"तू बोलून तर बघ" दादा त्याच्या विधानावर ठाम होता. ती थँक यु बोलून निघून गेली.
गौरी आता पंधरावीला होती. तिने दादाच्या क्लास मध्ये ऍडमिशन घेतलं होत. क्लासमध्ये सगळी मूल शिक्षकांना दादा बोलत असत. गुरू आणि विद्यार्थ्यामध्ये सर या शब्दामुळे अंतर तयार होत असत आणि दादा म्हणजे मोठा भाऊ. दादा या शब्दानेच ते अंतर भरू शकत या विचारानेच हि संस्कृती क्लासमध्ये पूर्वीपासून रुजू होती. मूल बिनधास्त येऊन त्यांचे प्रॉब्लेम्स दादाकडे सांगत व दादाकडून त्यांना समाधान हि मिळे. गौरीनेही हक्कानेच तिची हि घटना दादाकडे मांडली होती.
दुसऱ्या दिवशी पुन्हा गौरी दादाला भेटायला आली. आज ती बऱ्यापैकी खुश दिसत होती. दादाने तिचा चेहरा बघूनच ओळखलं कि सबकुच ओके हो गया है.
तिने आल्या आल्या दादाने विचारण्या अगोदरच सांगायला सुरुवात केली, "दादा काल इथून गेल्यावर मी सुरुवात कशी करू याचाच विचार करत होते. हे माझ्याकडून होईल कि नाही हे पण मला माहित नव्हत कारण मी कधीच आतापर्यंत कुणाला सॉरी बोलले नव्हते. संध्याकाळी जेव्हा पप्पा आले तेव्हा मी असून नसल्यासारखे ते वागत होते. त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मीही अजून सुरुवात कशी करावी या कोड्यातच होते. बराच वेळ गेला. जेवणाची वेळ झाली. जेवण झाल्यावर पप्पा लगेच झोपतात हे मला माहित होत आणि मला पुन्हा अजून एक दिवस वाढवायचा नव्हता. आता मी थोडी हिम्मत केली. पप्पा एका बाजूला त्यांचं काम करत उभे होते. मी त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसले आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांना 'सॉरी, माझं चुकल' एवढंच बोलले कारण मला लगेच रडू आलं आणि पुढचं मला बोलायला जमलच नाही. दादा खरं सांगते, मी लहानपणापासून आतापर्यंत माझ्या पप्पाच्या डोळ्यात कधीच अश्रू पाहिले नव्हतं. काल ते पहिल्यांदाच सगळ्यांसमोर रडले. मी एवढी मोठी आहे आता तरीही त्यांनी लहान मुलीसारखं मांडीवर बसवून मला जेवण भरवलं. आणि झोपताना ते सुद्धा मला सॉरी बोलले. माझ्या पप्पांचा माझ्यावर एवढा जीव आहे हे मला पहिल्यांदाच समजलं. थँक यु दादा." तिला आता पुढे बोलता येत नव्हतं. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी उभ राहील. पण तीच आजच रडणं खूप वेगळं होत. आज तिच्या रडण्यात काहीतरी गवसल्याच समाधान होत.
-सुबोध अनंत मेस्त्री
#sahajsaral
#sahajsaral
Fabulous Subodh Sir...
ReplyDeleteFeeling positive after red this.
ReplyDeleteYou are ever green bro...Subhodh Mestry