Skip to main content

लॉलिपॉप


"मी बिजनेस चालू करायचा विचार करतोय. आम्ही पाचजण तयार झालोय. सगळे शाळेतलेच मित्र. तू ओळखतोस सगळ्यांना. शाळेपासून आतापर्यंत काही ना काही निमित्ताने एकत्र भेटतोच आम्ही पण आता या निमित्ताने आयुष्यातला बराच वेळ एकत्र काढता येईल. आम्ही रायगडावर गेलो होतो तिथेच ठरवल आम्ही. कंपनीच नाव पण ठरलंय. स्वराज्य.", मी एकदम उत्साहात दादाला सांगत होतो आणि तोही तितक्याच उत्साहात मला प्रतिसाद देत होता. "अरे वा! मस्तच नाव ठरवलंय तुम्ही. महाराजांचा आदर्श समोर असेल तर काही चुकीच घडणार नाही आपल्या हातून. बिनधास्त कर. पैशांची गरज लागणार आहे का तुला?". दादाने विचारल्यावर मी नकारार्थी मान डोलावली. नंतर माझे स्वप्न आणि प्लॅन दादाला सांगण्यात बराच वेळ गेला आणि तोही ते ऐकत होता. प्रतिसाद देत होता.
मला त्यावेळी 3 वर्षाचा सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला अनुभव होता आणि कुणाच्या हाताखाली काम करण्याचा कंटाळा आल्याने स्वतःच स्वराज्य निर्माण करू अशी संकल्पना मी माझ्या मित्रांसमोर आमच्या रायगड ट्रिप मध्ये मांडली होती आणि माझ्या 4 मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. आयुष्यातली कोणतीही गोष्ट ठरवली की मी ती अगोदर दादाला सांगतो कारण त्याच्याकडून एक वेगळ्या प्रकारच मोटिवेशन मला मिळत असे. आमच्या घरात त्यावेळी तरी कमावणारे आम्ही दोघेच होतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा शून्यापासून चालू करण कितपत योग्य आहे हे मला कळण्याइतपत प्रॅक्टिकल मी नव्हतो. जो सोच लिया वो बस करना है या माझ्या स्वभावानेच मी माझी नोकरी सोडली व आम्ही पाच मित्रांनी मिळून सानपाडाला ऑफिस घेतलं आणि व्यवसाय चालू केला. कोणतेही झाड लगेच फळ देत नाही हाच नियम व्ययसायालाही लागू होतो. लवकरच मला पैशाची कमतरता भासायला लागली पण दादाला अजून त्रास द्यायचा नाही हे मी ठरवलं होत. बऱ्याचशा मित्रांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे माझं लाईफ तस व्यवस्थित चालू होत पण घराची पूर्ण जबाबदारी दादावर आली होती. "तू टेन्शन घेऊ नकोस. बिजनेस कर." एवढेच तो नेहमी बोलत असे. 3 महिन्यांनी दादाचं लग्न ठरलं आणि पैशाची जमवाजमव करण्यात दादा गुंतून गेला कारण लग्नाला लागणारा पुरेसा पैसा दादाकडे नव्हता. ही दादाची धावपळ मी स्वतः जवळून पाहत होतो आणि माझं मन मला एकाच गोष्टीसाठी खात होत, जर मी 3 महिने अजून जॉब केला असता तर एवढा त्रास झालाच नसता सगळं सुरळीत झालं असत. हे जर मला कळत होत मग दादाला ते त्यावेळी का नाही सुचलं. माझा स्वभाव दादाला माहित होता, मी लगेच उत्स्फूर्तपणे निर्णय घेतो. पण दादाने त्यावेळी ही गोष्ट मला पटवून दिली असती तर कदाचित मी बिजनेस थोडा उशिरा चालू केला असता. मी माझी हि नाराजी दादाकडे बोलून दाखवली. "तू त्यावेळी मला थांबवायला हवं होतस" दादा माझ्याकडे बघत होता. "चल बरेच दिवस चिकन लॉलिपॉप नाही खाल्लय." माझा चिकन लॉलिपॉप हा विक पॉईंट दादाला खूप चांगला माहित होता पण यावेळी मी त्याला भुलनार नव्हतो. मी माझा विषय लावून धरला. त्याने मला रिक्षात भरला आणि आमच्या आवडत्या हॉटेलसमोर रिक्षा थांबवली. आम्ही टेबल वर बसलो. दादाने ऑर्डर दिली. पण मला लॉलिपॉप मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी अजूनहि माझ्या विषयावर अडून बसलो होतो.
"तू एवढं विचारतोस म्हणून सांगतो. तू 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे आलास आणि तुझ स्वप्न ध्येय सांगितलंस. तुझ्या डोळ्यात एक ठिणगी मी पहिली. खर तर त्यावेळी मला माझ्या लग्नाबद्दल माहित होत आणि पैशाचा हा त्रास होईल याची सुद्धा कल्पना मी केली होती आणि तशी तयारीही. लग्नाचं काय रे होईल कसही मॅनेज. पण जर माझ्या लग्नासाठी मी तुला तुझा बिजनेसचा प्लॅन पुढे ढकलायला सांगितलं असता तर कदाचित 3 महिन्यात तुझी ती ठिणगी विझली असती आणि ती एनर्जी कायम राहिली नसती. माझ्या स्वार्थासाठी माझ्या भावाच्या स्वप्नाचा जीव घेणं योग्य आहे? जास्त विचार करू नकोस. तू जी स्वप्न जगशील ती माझ्यासाठी काही वेगळी नाहीत." दादाने इतक सहजपणे सांगून समोरच्या प्लेटमधून चिकनचा एक पीस उचलला आणि मला भरवला. त्या घासाबरोबरच मी आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा घेत होतो.
- सुबोध अनंत मेस्त्री

#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी