आईच्या घटनेनंतर काही दिवस पुस्तक वाचता आलं नाही आणि जेव्हा पुस्तक वाचण्याचा विचार केला तेव्हा नेमक्या "श्यामची आई" याच पुस्तकावर कपाटात पहिल्यांदा लक्ष गेलं. पुस्तक चांगलं आहे याबाबतीत शंका नव्हती पण इतकी वर्ष कपाटात असून पुस्तकांच्या गर्दीत नजरेत आलं नाही. जी गोष्ट सतत विचारात तीच नजरेसमोर पटकन येते असंच काहीस झालं. आईच्या आठवणीत असतानाच हे पुस्तक समोर आलं आणि पूर्ण वाचून काढलं.
सानेगुरुजींचे बाबा गावात खोत होते त्यामुळे घरात प्रचंड श्रीमंती. भावाभावांमधल्या प्रॉपर्टीमधल्या वादातून त्यांना घर सोडावं लागलं आणि बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना सानेगुरुजींच्या आई बाबांना करावा लागला. आयुष्यातली काही वर्ष वैभवात घालवून पुन्हा अगदी शून्यावर येणं म्हणजे कसोटीच होती. अपमानाच्या कित्येक प्रसंगातून पूर्ण कुटुंबाला जावं लागलं. पोटची दोन मुले त्यांना आयुष्याच्या प्रवासात गमवावी लागली. कित्येक अडचणी समोर आल्या पण त्यांनी आपली तत्वे सोडली नाहीत. मुलांवर संस्कार करताना त्यांनी कोणतीच तडजोड केली नाही.
पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी स्वतःच्या आयुष्यातल्या घटना शोधत होतो आणि मला तशा त्या सापडतही गेल्या. अगदीच बिकट परिस्थिती अनुभवली नसली तरी बेताबेताच्या आर्थिक परिस्थितीत जेवणाची आबाळ झाली नाही. आईने सगळी परिस्थिती सांभाळून गरजेला स्वतःच मंगळसूत्र गहाण ठेवून आमचं शिक्षण पूर्ण केलं. मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा आम्ही खूप लहान असताना पाणी २-४ किलोमीटरच्या अंतरावर जाऊन आणावं लागायचं. घरात बाबा आणि सगळे काका मिळून फक्त पुरुषच त्यामुळे सगळ्या कामाची जबाबदारी तिच्यावर होती आणि त्यावेळी तिने ती निभावून नेली. अशातच आम्हा तिघा भावंडाचा जन्म आणि त्यातून तिचे झालेले २-३ ऑपरेशन्स...कामामुळे तिला आराम मिळाला नाही आणि ती खचत गेली. शारीरिक व मानसिक त्रासाची सुरुवात झाली.
या सगळ्यातून मार्ग काढत तिने संसाराचा गाडा सुरळीत चालवला. बऱ्याच वाईट मुलांच्या संगतीत राहूनसुद्धा आम्ही बिघडलो नाही ते तिचेच यश. चांगल्या वाईटाची जाणीव तिने आम्हाला वेळोवेळी करून दिली. प्रसंगी कठोर होऊन मार दिला कधी प्रेमाने जवळ घेऊन समजवलं. पैशाचे लाड सुरुवातीपासूनच होऊ दिले नाहीत. माझे मित्र ट्युशनला जायचे म्हणून मी बऱ्याच वेळेला हट्ट करायचो पण तिने मला ट्युशन्स जॉईन करू दिले नाहीत. स्वतः अभ्यास करावा यावरच तिचा भर. मी हल्ली तिच्याकडे तो विषय काढला तर "तेव्हा कुठे रे तेवढे आपल्याकडे पैसे? तुमच्या तिघांचा वर्षभराचा खर्च जेमतेम निघायचा", असं तिने सांगितलं. मी शेंडेफळ असल्याने तिचा पदर कधी सोडलाच नाही. त्यात दादा, अण्णा दोघांची टीम असायची आणि मी वयाने लहान असल्याने एकटा पडायचो त्यामुळे आईचा सहवास मला खूप जास्त लाभला. चोरी-लबाडी करू नका, मिळेल ते जपून वापरा एकदाच संपवू नका किंवा आपल्या गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, मनाला धुळ लागू देऊ नका असे श्यामच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार, आई आमच्यावर करत राहिली. आमच्या घरी कायम एका माणसाचं जेवण जास्तच बनलेलं असायचं त्यामुळे कुणी अचानक जरी आलं तरी तो उपाशी जात नसे. कुठेही भेटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी हसून गोड बोलून चौकशी करणं त्यांची ओळख काढणं हा तिचा खास स्वभाव आतापर्यंत होता. तशी तिने बरीच माणसं जोडली. ती सगळ्यांची "मेस्त्रीन ताई" होती.
आता आपल्या घरी कुणी वेळी अवेळी आलं तर आपला शेड्युल बिघडतो. शेजारीही एक दुसऱ्याकडे जायला कचरतात कारण फ्लॅट संस्कृतीमध्ये घराचे दरवाजे कायम बंद. चाळीत त्यावेळी सकाळी दरवाजा उघडला की रात्री झोपताना बंद व्हायचा. मग ज्याला जेव्हा वाटेल कोणत्याही घरी घुसावं. आई गेल्यानंतर आमच्या चाळीत राहणारा बंड्या दादा सांत्वनासाठी आम्हाला भेटायला आला होता. "आम्ही त्यावेळी केव्हाही घरी येऊन तुमच्या माळ्यावर झोपायचो. स्वतः घरात प्लेटमध्ये घेऊन हाताने खायचो. वहीनी आम्हाला कधीच काही बोलली नाही. तिने आम्हालाही मुलांसारखंच जपलं", बंड्या दादाला वाटलेला आमच्या घरातला हा आपलेपणा सगळ्यांनाच तिच्यामुळे वाटायचा. माझे मित्रही घरी आले तर काही ना काही खाऊनच जायचे. चाळीत फिरणाऱ्या मांजरीही जेवणाच्या वेळेला बरोबर समोर येऊन बसायच्या. कारण त्यांना ईथे आवर्जून खायला मिळायचंच. काही उरलेलं नसेल तर स्वतःच्या ताटातली अर्धी चपाती आई द्यायची.
बिनधास्तपणा तिने आमच्यात लहानपणीच जबाबदारीने भिनवला होता. त्यामुळे आम्ही दिवसभर कुठेही फिरलो तरी जेवणाच्या वेळेत घरीच असायचो. अति काळजी मुलांच्या पायात बेड्या घालते हे तिला पूर्वीच समजलं होतं. बाहेर काहीही करा पण प्रकरण घरापर्यंत नाही आलं पाहिजे ही समज अप्रत्यक्षपणे आम्हाला असल्याने मोठे मोठे प्रॉब्लेम्स स्वताने सोडवण्याची ताकद लहानपणीच मिळाली. कणखर आणि स्पष्ट आवाज ही पण तिचीच देणगी.
प्रतिभाच्या आईला जाऊन ६ वर्ष झाली. तिनेही हे पुस्तक वाचलं होतं आणि तिला प्रत्येक गोष्टीत रडू आवरत नव्हतं. पुस्तकातली शेवटची गोष्ट ज्यामध्ये श्यामची आई हे जग सोडून जाते, ती वाचताना प्रतिभाने मला पाहिलं आणि विचारलं, "तुला रडू कसं येत नाही रे? की फक्त माझ्यासमोर स्ट्रॉंग आहे असं दाखवतोस?". मी आता एक्सेप्ट केलं आहे असं तिला सांगितलं आणि पुन्हा पुस्तक वाचायला लागलो. खरं तर पुढच्या काही महिन्यात माझी आई बेडरिडन होण्याच्या मार्गावर आहे हे मला व्यवस्थित कळालं होतं. तिचा टापटीपणा अजूनही टिकून होता. स्वतः अंथरुणाला खिळल्यावर तिची अवस्था आम्हा कुणालाच बघवली नसती. त्यात ती स्वतःच सगळं करत असताना, थोडीफार चालती फिरती असताना तिने जगाचा निरोप घेतला हे तिच्या दृष्टीने योग्य झालं. तिला कुणावर अवलंबुन राहणं पूर्वीपासूनच आवडत नव्हतं. कधी ना कधी प्रत्येकालाच या जगाचा निरोप घ्यायचा आहे पण मरण असं यावं की ते कळू नये. आईच अगदी तसंच झालं. तिची ती जन्मभराची पुण्याई! आपली माणसं आपल्याला कायम हवीच असतात पण त्यांना होणारा त्रास हा फक्त त्यांनाच माहित असतो. त्यांच्या आठवणी कायम आपल्या मनात घर करून असतातच. असाही मी आईचाच अंश आहे. ती माझ्यातच आहे...कायम!
- सुबोध अनंत मेस्त्री
Awesome , todays generation are missing "Shamchi Aai " becouse every have online mom.
ReplyDeleteTrue :)
Delete