माझा हा लेख त्या मित्रांसाठी आहे जे आज धावण्याच्या गडबडीत जगणं विसरले आहेत. आवर्जून वाचा.
===================================
2 दिवसापूर्वीच एक विचित्र घटना कानावर पडली आणि मन सुन्न झालं. दादाचा खास मित्र विजय याचा अपघाती मृत्यू झाला. त्याची बायको हि त्याची शाळेपासूनची प्रेयसी म्हणजेच 20 अधिक वर्षाची दोघांची ओळख आणि लग्नानंतर यांना एक पाच वर्षाची मुलगी त्रिशा. दादा मला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत होता. दादा आणि विजयने सोसायटीमध्ये एकत्र बरेच सण एकत्र साजरे केले होते आणि त्यामुळे त्यांची यारी जबरदस्त जमली होती. प्रत्येक पार्टीची जान होता विजय. दादाने त्याला कधी नाराज पहिलाच नव्हता. तो फक्त नाराज असायचा त्याची मुलगी आजारी असताना. त्याचा त्रिशा वर खूप जीव आणि तिलाही सारखा बाबाच लागायचा. त्रिशा आजारी असताना तो दादाला नाराजीने सांगायचा, "त्रिशा आजारी आहे रे. ती जेवत नसेल ना तर मलाही जेवण जात नाही. हि लहान पोर खेळता खेळता शांत झाली कि कशात मन लागत नाही.". गटारी एन्जॉय करायची म्हणून विजयच्या सगळ्या मित्रांनी रेसॉर्ट वर पिकनिक प्लॅन केला.
पिकनिकला निघताना तो आईची मस्करी करत होता. त्याने आईला सांगितलं कि, "पार्टीमध्ये मी खूप दंगा करणार, भरपूर नाचणार, मजा करणार". पण कोण जाणे का? त्या दिवशी त्याने जाऊ नये असं सारखं तीला वाटत होतं. तो तस करणार असेल तर बोलणार नाही अशीही अट तिने घातली होती. घरातून निघताना त्याने आईला खूप वेळा जातो सांगितलं, जवळ घेतलं पण आई त्याच्याकडे मुद्दाम बघत नव्हती. तो अगदी निघेपर्यंत तिला बाय करत होता पण आईने लक्ष दिल नाही. हा निरोप शेवटचा असेल याची कल्पना तिला तरी कुठे होती. तो निघून गेला तो कायमचाच. त्रिशा मात्र सोसायटीमधल्या तिच्या लहान मित्रांना सांगते कि, "माझा पप्पा मेला". विजय मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर असल्याने तो नेहमी दोन महिन्यातून एक फॉरेन टूर करायचा आणि काही दिवस बाहेर असायचा. तिला तसाच काहीसा प्रकार वाटला असेल. तिलाही या शब्दाची कल्पना नसावी कि तिचा पप्पा पुनः कधी फिरून येणार नाही. गेल्या वर्षभरात बऱ्याच मित्रांबद्दल माझ्या कानावर अशा गोष्टी आल्या आहेत. काही अपघातात गेले, काही अटॅकने. पण होते सगळे जवळपास माझ्याच वयाचे. आणि त्यात आता हि महाडची पूल वाहून गेल्याची दुर्घटना. माणसाचं आयुष्य किती अनिश्चित आहे. हे सगळ ऐकत असताना हॅपी जर्नी या मराठी चित्रपटातला एक डायलॉग मला आठवत होता, "आपल्या आजूबाजूला असणारी, आपली वाटणारी माणस अशी अचानक गायब होतात. कुठेतरी लांब निघून जातात आणि पुन्हा परत कधीच येत नाहीत. ती गेल्यावर कळतं कि याच्याबरोबर खूप चांगले क्षण जगायचे राहून गेले". आज आपल्याबरोबर असणारी व्यक्ति उदया आपल्याबरोबर असेल हे कुणाला माहीत आहे? बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांना दुखवतो, वाईट बोलून जातो, प्रेमाने जवळ करत नाही किंवा त्यांचं आपल्या आयुष्यातलं महत्व त्यांना स्वतः कधी सांगत नाही. आपला गर्व किंवा "मीच का?" हा स्वभाव आपल्याला आडवा येत असतो. पण बऱ्याच वेळेला हे बोलणं कायमच राहून जात. म्हणून जे तुमच्या आयुष्यात महत्वाचे आहेत, आई, बाबा, भाऊ, बहीण, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी त्यांना आजच सांगा कि त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे. तुमचे एकत्र घालवलेले क्षण त्यांच्याबरोबर शेअर करा. जुन्या आठवणी खोदून काढा. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊ द्या. त्या हास्याच कारण तुम्ही बना. त्यांचं ऐका. त्यांच्यावर मनसोक्त निःस्वार्थी प्रेम करा. कारण कोणती भेट शेवटची असेल हे फक्त नियतीलाच माहित.
दुसरी गोष्ट आवर्जून या घटनेतून लक्षात आली आणि जी मला मित्रांबरोबर शेअर करावीशी वाटली. काही लोक जगायचं विसरून गेले आहेत. फक्त जॉब करणं, शनिवार रविवार सुट्टी मग त्यात एखादी फॅमिली पिकनिक करायची किंवा आराम करायचा हाच एक मशीन पद्धतीने शेड्यूल ठरलेला असतो. त्यांनी हि आयुष्य जगण्याची व्याख्याच बनवून टाकली आहे. ऑफिसच पॉलिटिक्स आणि संसार हे त्यांचे दोन चघळण्याचे विषय. भविष्यासाठी खूप सारा पैसा कमावणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अख्ख तारुण्य यांनी पणाला लावलेलं आहे. हेच मित्र मला विचारतात, "तू एवढ्या सगळ्या गोष्टी कशा करतो रे? तू बिजनेस पण करतो, सोशल ऍक्टिव्हिटी पण करतो, मोठे इव्हेंट करतो, त्यात नाटकात पण काम करतो, खेळायला जातो, फिरायला जातो, ट्रैनिंग घेतो आणि ट्रैनिंग देतो पण. क्लासमध्ये शिकवतो. वाचतो, लिहितो. कधी मध्येच ब्लेझर घालून मोठ्या लोकांबरोबर फोटो तर कधी मित्राबरोबरचे फोटो. तू वेळ मॅनेज कसा करतो?" बऱ्याच वेळेला हा प्रश्न 'माझा एकाच गोष्टीवर कल नाही' अशा प्रकारच्या टोमण्याच्या सुरात असतो. माझं या प्रश्नावर एक सोप उत्तर तयार असत, "मी जगतो फक्त. मी उद्या असेन कि नसेन हे मला माहित नाही, पण जेव्हा डोळे मिटेन तेव्हा या जगण्याच्या धावपळीत एखादी गोष्ट करायची राहून गेली अशी फिलिंग माझ्या मनात नसेल एवढी काळजी घेतो". बऱ्याच वेळेला हे उत्तर टिंगल टवाळी मध्ये घेतलं जात. पण जो भूतकाळात अडकलेला आहे आणि भविष्यात काय होणार याच्या चिंतेत गुरफटला आहे तो वर्तमानात काय जगणार अस समजून मी दुर्लक्ष करतो. शेवटी प्रत्येकाची आयुष्याची व्याख्या ठरलेलीच आहे. पर जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही. शेवटी एका गाण्यातही सांगितलंच आहे, "हर पल यहा जी भर जियो, जो है समा कल हो ना हो"
- सुबोध अनंत मेस्त्री
9221250656
#sahajsaral
Comments
Post a Comment