Skip to main content

माणुसकीची भिंत



माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो.

माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं. 
एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असलेल्या गोष्टी टांगता येतील आणि ज्यांना गरज आहे ते त्यातल्या काही गोष्टी स्वतःच्या वापरासाठी काढून नेतील.  मला संकल्पना भन्नाट वाटली.  त्याने काही दिवसात ते प्रत्यक्षात उतरवलंसुद्धा.  मी आणि दादा आवर्जून भेटायला गेलो.  लोअर परेलला पेनिनसुला कॉम्प्लेक्सच्या मागे भिंत उभारली होती ज्यावर "माणुसकीची भिंत" मोठ्या शब्दात लिहिलं होतं.  खाली टेबल मांडून त्यावर जुने कपडे ठेवण्यात आले होते.  काही गरीब घरातली माणसं त्यातले कपडे एक एक वेचून घेत होती.  मी तो प्रसंग पाहून भरून पावलो. 

"लोकांना फायदा होतो काय रे?" मी विचारलं. 

"गैरफायदा घेतात", त्याने हसत सांगितलं, "काही लोक रोज येऊन काही ना काही कपडे घेऊन जातात आणि बाहेर विकतात."
गरजेपोटी असेल किंवा लालसेपोटी असेल पण माणसाच्या स्वभावाची कीव आली.  'प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण होतील एवढं या समाजात नक्कीच आहे पण प्रत्येक व्यक्तीची हाव पूर्ण होईल एवढं नक्कीच नाही', गांधीजींचा विचार आठवला. 

"ही पहिलीच वेळ होती.  पुढच्या वेळी नक्कीच अजून तयारीनिशी करू", हे वाक्य त्याने त्यावेळी घेतलं.  आपण ज्या विभागात राहतो तिथल्या लोकांचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून स्वतःचा व्यवसाय काही दिवस बाजूला ठेवून पुंडलिक, रागिणी वहिनी आणि त्यांचे सहकारी महेश चव्हाण सर आणि सुधीर पाटील सर त्यावेळी दिवस रात्र काम करत होते. 

काही दिवसांपूर्वी पुंडलिकची "माणुसकीची भिंत"ची पोस्ट फेसबुकवर पाहीली आणि मग व्हाट्सअपवरसुद्धा आली.  यावेळी सुनील शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  आज तिकडे आवर्जून हजेरी लावली. डोळ्याचं पारणं  फिटलं.  मागच्या वेळेपेक्षा खूपच सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.  मी माझे कपडे जसे दिले तसं माझं नाव नोंदवून घेण्यात आलं नि माझ्याकडून किती कपडे आले याचा अंदाज नोंदवून घेण्यात आला.   सगळे टेबल कपड्यांनी खचाखच भरले होते.  एका बाजूला जुन्या सायकल व खेळणी ठेवली होती. २०-२५ स्वयंसेवक पुरुष व महिला तिकडे काम करत होत्या.  त्यांच्या दिवसभराचा खाण्यापिण्याचा खर्च सोडला तर बाकी काही मानधन वैगेरे घेत नाहीत असं महेश सरांनी सांगितलं.  काही लोक जुनेच नाही तर नवे कपडेसुद्धा आणून देतात हे त्यांच्याकडून कळालं.  या मांडलेल्या गोष्टी घेणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी होती.  या जुन्या गोष्टी घेणाऱ्यांकडूनसुद्धा त्या गोष्टींची नोंद घेतली जात होती.  पुंडलिकची दोन मुलं काउंटरला तर रागिणी वहिनी कपडे व्यवस्थित मांडण्याच्या कामात व्यस्त होत्या.  एका ठिकाणी बोर्डवर किती कपडे आले आणि किती गेले याची दिवसागणिक मांडणीही केली होती.  "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे" हे ब्रीदवाक्य.  म्हणजे फक्त गरीबच नाही तर कुणीही वस्तू घेऊन जाऊ शकत होतं.  दिवाळी जवळ आली असल्याने बऱ्याच जणांनी साफसफाई केली असणार आणि त्यात नको असलेल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी इथे दान केल्या असणार.  पब्लिकचा रिस्पॉन्स बघून त्याने अजून एक दिवस वाढवला होता. 





"किती कपडे आले यावर्षी?", मी सहज पुंडलिकला प्रश्न केला.

"पन्नास हजारापेक्षा जास्त असतील.  मागच्या वेळी चाळीस हजार च्या आसपास आले होते", त्याने सांगितलं.

"अरे मग एवढे कपडे जातील का?", मी उत्सुकतेने विचारलं.

"नाही गेले तरी आपण ते व्यवस्थित पॅक करून जिथे स्लम एरिया आहे तिथे किंवा आदिवासी पाड्यात स्टॉल लावतो आणि तिथे वाटप करतो", त्याने फक्त माझ्या शंकेच निरसनच केलं नाही तर माझ्या मनात त्याच्याबद्दल अजून कौतुक निर्माण केलं.  म्हणजे फक्त तीन चार दिवसाची मेहनत नाही तर पुढेही अजून होणारच आहे.  मी कौतुकाने जमतील तेवढे फोटो क्लिक करून घेतले आणि त्याचा आणि महेश सरांचा फोटो काढण्यासाठी त्याला भिंतीसमोर उभं राहण्याची विनंती केली.   



"कशाला?", त्याचा अपेक्षित प्रश्न.

"एवढं मोठं काम करतोयस.  तुझ्यासाठी काहितरी लिहीन म्हणतो", माझ्या या उत्तरावर तो हसला.  तिथे सामनाचे पत्रकार आले.  त्याला व्यत्यय नको म्हणून आम्ही तिथून निघालो.  जगात चांगल्या व्यक्ती आणि चांगल्या प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला असतील तर आपल्याकडून काहीतरी चांगलं घडण्याची उर्मी आपोआप निर्माण होते.  माझ्या आयुष्यात असे बरेच पुंडलिक सारखे मित्र आहेत ही देवाचीच देणगी.

- सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

Comments

  1. Dada kharach khup changli goshat aahe ani yatun jo milnara aanand ani samadhan aahe he aaple jeevan sarthaki laglyacha janiv karun det.

    Thank you dada ani Mala hi yat sahbhag ghenyas awadel jar Konala objection nasel tar

    ReplyDelete
  2. सुबोध सर, नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख.
    आपल्याकडे जे आहे किंवा नको असेल ती वस्तू जर समाजोपयोगी असेल तर त्यासाठी "माणुसकीची भिंत" हा उपक्रम आयोजित करणं खूप मोठं काम आहे.

    "माणुसकीची भिंत" हे नावचं खूप काही सांगून जाते. समाज कार्य करण्याचा हा खूप चांगला उपक्रम आहे.
    पुंडलीक सर आणि त्यांचे सहकारी यांना या महत्वपूर्ण कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...