प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. जे तुम्हाला दिसतं ते खरं असतंच असं नाही. असंच काहीसं या दोन्ही पुस्तकातून तुम्हाला कर्णाबद्दल वाचताना वाटतं. पांडवांची अयोग्य बाजू बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने दिसून येते. महाभारत म्हटलं कि सहसा पाच पांडव, श्रीकृष्ण, दुर्योधन, धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, द्रौपदी आणि शकुनी मामा हेच डोळ्यासमोर येतात. कर्णाची त्यातली महत्वाची भूमिका ही या दोन्ही पुस्तकांमुळे समोर येते.
सूर्याच्या दिव्य शक्तीतून जन्मलेला कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय, पण कौमार्य अवस्थेत बाळाला जन्म दिला म्हणून गंगेच्या पात्रात तिने त्याला लाकडाच्या पेटीत सोडलं. क्षत्रिय म्हणून जन्माला येऊन सुद्धा एका सारथ्याने व त्याच्या पत्नीने राधामातेने त्याला वाढवले (म्हणूनच राधेय) यासाठी आयुष्यभर "सूतपुत्र" म्हणून हिणवला गेलेला व पदोपदी अपमान झालेला हा कर्ण. दुर्योधनाने प्रत्येक वेळी पडत्या क्षणी हात धरून त्याचा मानमरातब कायम राखण्याचा प्रयत्न केला म्हणून युद्धाच्या आधी आपण जेष्ठ पांडव आहोत हे माहित असताना सुद्धा दुर्योधनासोबत राहून आपल्या सख्ख्या भावांशी निकराने लढलेला असा विश्वसनीय कर्ण. कुंतीने अगदी युद्धाच्या क्षणी आपल्या मातृत्वाची जाणीव करून दिल्यावर तिच्या शब्दासाठी आपल्या जीवाला धोका असताना पाच भावांपैकी ४ भावांना ठार करणार नाही असं वचन देऊन घनघोर युद्धात ते पाळणारा असा तत्वनिष्ठ कर्ण. आपल्या दिव्यपुत्र अर्जुनाला वाचवण्यासाठी दान मागायला येणाऱ्या इंद्रदेवाला सगळ्यांचा विरोध असतानाही हसतमुखाने कवचकुंडलाच दान देणारा दानशूर कर्ण. शेवटच्या क्षणी निःशस्त्र असताना युद्धधर्माच्या विरोधात जाऊन अर्जुनाला बाण चालविण्याचा आदेश देणाऱ्या कृष्णाला मरण्याआधी भक्तीभावनेने हसत मुखाने नमस्कार करणारा भक्त कर्ण.
महाभारताची कथा काल्पनिक असेल तरीही भगवतगीतेतून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो तसेच या पुस्तकातून एक व्यक्ती म्हणून उलगडलेला कर्ण आणि त्याच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला अनुभवायला मिळतात. "राधेय" वाचताना हरवून जायला होतंच पण मृत्युंजय वाचताना तुम्ही पूर्णपणे कर्णमय होऊन जाता.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment