Skip to main content

मृत्युंजय

 




काही वर्षांपूर्वी रणजित देसाईंच "राधेय" वाचलं होतं.  महाभारतातल्या कर्णाची बाजू त्यात प्रकर्षाने मांडली होती.  त्यावेळीच कुणीतरी शिवाजी सावंत यांचं "मृत्युंजय" वाच असं सुचवलं.  आमच्या सुनयना गायकवाड ताईने राबवलेल्या पुस्तक प्रदर्शनात मी ते दोनेक वर्षांपूर्वी घेतलं आणि पुस्तकाची लहान अक्षरात छापलेली ७२७ पाने बघून ते "एवढं कधी वाचून व्हायचं?" म्हणून कायम पुढे जात राहिलं.  पण दर दिवशी पाच असे २३९ धडे वाचायचे हा निर्धार करून गेल्या दीडेक महिन्यात पुस्तक पूर्ण वाचून काढलं.  

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.  जे तुम्हाला दिसतं ते खरं असतंच असं नाही.  असंच काहीसं या दोन्ही पुस्तकातून तुम्हाला कर्णाबद्दल वाचताना वाटतं.  पांडवांची अयोग्य बाजू बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने दिसून येते.  महाभारत म्हटलं कि सहसा पाच पांडव, श्रीकृष्ण, दुर्योधन, धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, द्रौपदी आणि शकुनी मामा हेच डोळ्यासमोर येतात.  कर्णाची त्यातली महत्वाची भूमिका ही या दोन्ही पुस्तकांमुळे समोर येते.  

सूर्याच्या दिव्य शक्तीतून जन्मलेला कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय, पण कौमार्य अवस्थेत बाळाला जन्म दिला म्हणून गंगेच्या पात्रात तिने त्याला लाकडाच्या पेटीत सोडलं. क्षत्रिय म्हणून जन्माला येऊन सुद्धा एका सारथ्याने व त्याच्या पत्नीने राधामातेने त्याला वाढवले (म्हणूनच राधेय) यासाठी आयुष्यभर "सूतपुत्र" म्हणून हिणवला गेलेला व पदोपदी अपमान झालेला हा कर्ण.  दुर्योधनाने प्रत्येक वेळी पडत्या क्षणी हात धरून त्याचा मानमरातब कायम राखण्याचा प्रयत्न केला म्हणून युद्धाच्या आधी  आपण जेष्ठ पांडव आहोत हे माहित असताना सुद्धा दुर्योधनासोबत राहून आपल्या सख्ख्या  भावांशी निकराने लढलेला असा विश्वसनीय कर्ण.   कुंतीने अगदी युद्धाच्या क्षणी आपल्या मातृत्वाची जाणीव करून दिल्यावर तिच्या शब्दासाठी आपल्या जीवाला धोका असताना पाच भावांपैकी ४ भावांना ठार करणार नाही असं वचन देऊन  घनघोर युद्धात ते पाळणारा असा तत्वनिष्ठ कर्ण.  आपल्या दिव्यपुत्र अर्जुनाला वाचवण्यासाठी  दान मागायला येणाऱ्या इंद्रदेवाला सगळ्यांचा विरोध असतानाही हसतमुखाने कवचकुंडलाच दान देणारा दानशूर कर्ण.   शेवटच्या क्षणी निःशस्त्र असताना युद्धधर्माच्या विरोधात जाऊन अर्जुनाला बाण चालविण्याचा  आदेश देणाऱ्या कृष्णाला मरण्याआधी भक्तीभावनेने हसत मुखाने नमस्कार करणारा भक्त कर्ण. 

महाभारताची कथा काल्पनिक असेल तरीही भगवतगीतेतून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो तसेच या पुस्तकातून एक व्यक्ती म्हणून उलगडलेला कर्ण आणि त्याच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला  अनुभवायला मिळतात.  "राधेय" वाचताना हरवून जायला होतंच पण मृत्युंजय वाचताना तुम्ही पूर्णपणे कर्णमय होऊन जाता. 

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी