Skip to main content

लॉलिपॉप


"मी बिजनेस चालू करायचा विचार करतोय. आम्ही पाचजण तयार झालोय. सगळे शाळेतलेच मित्र. तू ओळखतोस सगळ्यांना. शाळेपासून आतापर्यंत काही ना काही निमित्ताने एकत्र भेटतोच आम्ही पण आता या निमित्ताने आयुष्यातला बराच वेळ एकत्र काढता येईल. आम्ही रायगडावर गेलो होतो तिथेच ठरवल आम्ही. कंपनीच नाव पण ठरलंय. स्वराज्य.", मी एकदम उत्साहात दादाला सांगत होतो आणि तोही तितक्याच उत्साहात मला प्रतिसाद देत होता. "अरे वा! मस्तच नाव ठरवलंय तुम्ही. महाराजांचा आदर्श समोर असेल तर काही चुकीच घडणार नाही आपल्या हातून. बिनधास्त कर. पैशांची गरज लागणार आहे का तुला?". दादाने विचारल्यावर मी नकारार्थी मान डोलावली. नंतर माझे स्वप्न आणि प्लॅन दादाला सांगण्यात बराच वेळ गेला आणि तोही ते ऐकत होता. प्रतिसाद देत होता.
मला त्यावेळी 3 वर्षाचा सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला अनुभव होता आणि कुणाच्या हाताखाली काम करण्याचा कंटाळा आल्याने स्वतःच स्वराज्य निर्माण करू अशी संकल्पना मी माझ्या मित्रांसमोर आमच्या रायगड ट्रिप मध्ये मांडली होती आणि माझ्या 4 मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. आयुष्यातली कोणतीही गोष्ट ठरवली की मी ती अगोदर दादाला सांगतो कारण त्याच्याकडून एक वेगळ्या प्रकारच मोटिवेशन मला मिळत असे. आमच्या घरात त्यावेळी तरी कमावणारे आम्ही दोघेच होतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा शून्यापासून चालू करण कितपत योग्य आहे हे मला कळण्याइतपत प्रॅक्टिकल मी नव्हतो. जो सोच लिया वो बस करना है या माझ्या स्वभावानेच मी माझी नोकरी सोडली व आम्ही पाच मित्रांनी मिळून सानपाडाला ऑफिस घेतलं आणि व्यवसाय चालू केला. कोणतेही झाड लगेच फळ देत नाही हाच नियम व्ययसायालाही लागू होतो. लवकरच मला पैशाची कमतरता भासायला लागली पण दादाला अजून त्रास द्यायचा नाही हे मी ठरवलं होत. बऱ्याचशा मित्रांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे माझं लाईफ तस व्यवस्थित चालू होत पण घराची पूर्ण जबाबदारी दादावर आली होती. "तू टेन्शन घेऊ नकोस. बिजनेस कर." एवढेच तो नेहमी बोलत असे. 3 महिन्यांनी दादाचं लग्न ठरलं आणि पैशाची जमवाजमव करण्यात दादा गुंतून गेला कारण लग्नाला लागणारा पुरेसा पैसा दादाकडे नव्हता. ही दादाची धावपळ मी स्वतः जवळून पाहत होतो आणि माझं मन मला एकाच गोष्टीसाठी खात होत, जर मी 3 महिने अजून जॉब केला असता तर एवढा त्रास झालाच नसता सगळं सुरळीत झालं असत. हे जर मला कळत होत मग दादाला ते त्यावेळी का नाही सुचलं. माझा स्वभाव दादाला माहित होता, मी लगेच उत्स्फूर्तपणे निर्णय घेतो. पण दादाने त्यावेळी ही गोष्ट मला पटवून दिली असती तर कदाचित मी बिजनेस थोडा उशिरा चालू केला असता. मी माझी हि नाराजी दादाकडे बोलून दाखवली. "तू त्यावेळी मला थांबवायला हवं होतस" दादा माझ्याकडे बघत होता. "चल बरेच दिवस चिकन लॉलिपॉप नाही खाल्लय." माझा चिकन लॉलिपॉप हा विक पॉईंट दादाला खूप चांगला माहित होता पण यावेळी मी त्याला भुलनार नव्हतो. मी माझा विषय लावून धरला. त्याने मला रिक्षात भरला आणि आमच्या आवडत्या हॉटेलसमोर रिक्षा थांबवली. आम्ही टेबल वर बसलो. दादाने ऑर्डर दिली. पण मला लॉलिपॉप मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी अजूनहि माझ्या विषयावर अडून बसलो होतो.
"तू एवढं विचारतोस म्हणून सांगतो. तू 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे आलास आणि तुझ स्वप्न ध्येय सांगितलंस. तुझ्या डोळ्यात एक ठिणगी मी पहिली. खर तर त्यावेळी मला माझ्या लग्नाबद्दल माहित होत आणि पैशाचा हा त्रास होईल याची सुद्धा कल्पना मी केली होती आणि तशी तयारीही. लग्नाचं काय रे होईल कसही मॅनेज. पण जर माझ्या लग्नासाठी मी तुला तुझा बिजनेसचा प्लॅन पुढे ढकलायला सांगितलं असता तर कदाचित 3 महिन्यात तुझी ती ठिणगी विझली असती आणि ती एनर्जी कायम राहिली नसती. माझ्या स्वार्थासाठी माझ्या भावाच्या स्वप्नाचा जीव घेणं योग्य आहे? जास्त विचार करू नकोस. तू जी स्वप्न जगशील ती माझ्यासाठी काही वेगळी नाहीत." दादाने इतक सहजपणे सांगून समोरच्या प्लेटमधून चिकनचा एक पीस उचलला आणि मला भरवला. त्या घासाबरोबरच मी आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा घेत होतो.
- सुबोध अनंत मेस्त्री

#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...