Skip to main content

प्रतिपश्चंद्र : इतिहास, रहस्य आणि कल्पनाशक्तीचा अद्वितीय संगम

 


प्रतिपश्चंद्र : इतिहास, रहस्य आणि कल्पनाशक्तीचा अद्वितीय संगम

मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबऱ्यांची समृद्ध परंपरा आहे. मात्र इतिहास आणि रहस्य यांचा प्रभावी मेळ घालणाऱ्या कादंबऱ्या तुलनेने कमी आढळतात. डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांची “प्रतिपश्चंद्र” ही कादंबरी या दृष्टीने वेगळी ठरते. छत्रपती शिवाजी महाराज, बहिर्जी नाईक, राजमुद्रा आणि शतकानुशतके लपलेले एक गूढ रहस्य याभोवती विणलेली ही कथा वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

कादंबरीची सुरुवात एका आधुनिक गुन्हेगारी प्रकरणापासून होते. एका मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरवर न्यायाधीशांच्या खुनाचा आरोप होतो आणि त्यानंतर सुरू होतो रहस्य, इतिहास आणि साहसाचा थरारक प्रवास. वर्तमान आणि शिवकाल यांना जोडणारी कथानकाची मांडणी ही या कादंबरीची सर्वात मोठी ताकद आहे.

लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना ऐतिहासिक घटनांना कल्पनाशक्तीची प्रभावी जोड दिली आहे. बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर व्यवस्थेचा संदर्भ, राजमुद्रेशी निगडित रहस्य आणि त्याभोवती उभे राहणारे प्रश्न वाचकाची उत्कंठा कायम ठेवतात. इतिहासाची पार्श्वभूमी असूनही कथा आधुनिक काळाशी सहज जोडली जाते, 

डॉ. प्रकाश कोयाडे यांची भाषा सहज सोपी, प्रासंगिक आणि वेगवान आहे. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केले आहे. रहस्य उलगडताना वाचकाला सतत नवे धक्के मिळत राहतात. त्यामुळे कादंबरीचा वेग शेवटपर्यंत कायम राहतो.

या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने केलेला अभ्यास. इतिहास, पुरातत्त्व, धार्मिक स्थळे, भारतीय संस्कृती आणि विविध ऐतिहासिक संदर्भ यांचा वापर कथानकात प्रभावीपणे केला आहे. त्यामुळे ही केवळ मनोरंजन करणारी रहस्यकथा राहत नाही, तर वाचकाला विचार करायला भाग पाडणारी साहित्यकृती बनते.  लेखकाने इतिहासाचा आदर राखत कल्पनाशक्तीचा वापर केला असल्यामुळे कथा अधिक प्रभावी बनते.

मागच्या वर्षी हॉटस्टार वर याच कादंबरीवर आधारित "सिक्रेट ऑफ शिलेदार्स" नावाची वेबसिरीज आली होती.  ती जरी पाहिली असेल तरी बऱ्यापैकी वेगळ्या घटना, गोष्टी आणि रहस्य या कादंबरीमध्ये मांडल्या गेल्या आहेत.   प्रत्येकाने ही कादंबरी अवश्य वाचावी. 

- सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...