Skip to main content

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण

 


श्रीमानयोगी वाचण्यापूर्वी मी कै. बाबासाहेब पुरंदरे यांची राजे शिवछत्रपती वाचली होती.  मुळात सिरियल्स मधून किंवा सिनेमामधून महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडला जातोच.  बऱ्याचशा गोष्टी ज्या ऐकल्या किंवा वाचल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीने श्रीमानयोगी मध्ये मांडल्या आहेत जसं कि महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली असं वाचलं होतं पण या कादंबरीमध्ये रोहिडेश्वरावर सांगितली आहे.  किंवा अफझलखान स्वारीच्या वेळी सईबाईंचे निधन झाले तेव्हा महाराज त्यांच्यासोबत नव्हते हे वाचलं होतं पण यात महाराज सईबाईंसोबत आहेत हे मांडलं आहे.  थोडं गोंधळून मी विनोद दादाला हा प्रश्न विचारला तेव्हा इतिहासकार आणि कादंबरीकार यात फरक असतो हे समजलं.  कादंबरीकार गोष्ट लिहिताना बरीच लिबर्टी घेतात त्यामुळे ती गोष्टरूपाने वाचली गेली पाहिजे याचा उलगडा झाला.  त्या दृष्टिकोनातून वाचल्यावर हे पुस्तक दमदारच आहे.  एक कर्तव्यदक्ष पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निभावत असलेली प्रत्येक भूमिका यात चोख मांडली आहे.  

स्वराज्याचं तोरण उभारत असताना महाराजांना घरापासून बऱ्याच वेळा लांब राहावं लागलं.  सईबाईंच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज एकटे असताना त्यांना जिजाऊंचा आधार होता.  पण जिजाऊंच्या निधनानंतर संभाजी महाराज आणि महाराज यांच्यातला दुवा संपला. ज्याकाळी स्वतःची माणसे दुरावली असताना संभाजी महाराजांना आधाराची गरज होती तेव्हा महाराज मोहिमेत व्यस्त असल्यामुळे ही दरी वाढत गेली आणि बाकीचा इतिहास बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहेच किंबहुना छावा चित्रपटामुळे तो लोकांसमोर आला आहे.  ज्यांनी समाजासाठी योगदान दिलं त्या सगळ्या योध्यांना किंवा संताना आपल्या कुटुंबावर पाणीच सोडावं लागलं.  

या पुस्तकातून सतत जाणवत राहते की स्वराज्य ही केवळ सत्ता मिळवण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती, तर ती एक जबाबदारी होती. सामान्य माणसाच्या जीवनात सुरक्षितता, सन्मान आणि न्याय आणण्याचे स्वप्न महाराजांनी उराशी बाळगले होते. स्वतःच्या सुखापेक्षा समाजाचे दुःख मोठे मानणारा हा राजा आजच्या स्वार्थी जगात आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतो की आपण जे करतो, ते स्वतःसाठी की समाजासाठी?  श्रीमानयोगी वाचताना नेतृत्वाची खरी व्याख्या समजते. सत्ता असूनही अहंकार नाही, विजय असूनही क्रौर्य नाही आणि शत्रू असूनही अधर्म नाही. स्त्रियांचा सन्मान, शत्रूच्या स्त्रियांकडे मातेसारखे पाहण्याची भावना, आणि धर्माच्या नावाखाली अन्याय न करण्याचा ठाम विचार समाजाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण देतो.  त्यात चुका सगळ्यांकडून होऊ शकतात हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने जाणवून दिलं आहे. 

या कादंबरीतला प्रत्येक संघर्ष आपल्याला सांगतो की महानता सहज मिळत नाही. अपमान, संकटे, विश्वासघात, पराभव, त्याग हे सगळे झेलत महाराज उभे राहिले. हार मानण्याचा सोपा मार्ग असतानाही त्यांनी लढण्याचा कठीण मार्ग स्वीकारला. श्रीमानयोगी आपल्याला आत्मसन्मानाचे महत्त्वही शिकवते. गुलामी ही फक्त राजकीय नसते, ती मनाचीही असते. स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि अस्तित्वाचा अभिमान जागा झाला की समाज उभा राहतो. महाराजांनी तलवारीने लढा दिलाच, पण त्याहून अधिक लढा त्यांनी मनाच्या स्वातंत्र्यासाठी दिला आणि हाच लढा आजही प्रत्येकाने लढण्याची गरज आहे.


सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...