Skip to main content

देवाला जागा नाही...


नेहमीप्रमाणे रस्ता क्रॉस करून मी मैत्रीपार्क बस स्टँडच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या साईबाबा मंदिराच्या बाहेर पोहचलो.  सहाचा क्लासमध्ये लेक्चर आहे तर आता परत जाताना घाई करावी लागेल या विचारात असतानाच समोर पाहिलं तर नेहमी मंदिराबाहेर रस्त्यावर दिसणाऱ्या हारवाल्या मावशी दिसल्या नाहीत.  तिथे काही म्हातारे आजी आजोबा पण काही मिळेल या आशेने बसलेले असायचे ते पण दिसत नव्हते.  डावीकडे मंदिरात जायला वळालो तर मंदिराच्या गेटवर कापड टाकलं होतं.  त्यामुळे आतलं काही दिसत नव्हतं.  गेटबाहेच्या दोन शिड्या तोडल्या होत्या.  मागच्या बाजूने मंदीरात शिरण्याचा रस्ता मला माहीत होता.  काहीतरी काम चालू असेल या विचाराने मी आत शिरलो.  आत एक वयस्कर बाई मांडी घालून गाभाऱ्यात पाहत बसल्या होत्या.  आत शिरल्यावर गाभारा पाहिला आणि अंगावर काटा आला.  गाभाऱ्यात दिमाखात असणारी साईबाबांची ती उंच मूर्ती तिथे नव्हती.  आजूबाजूच्या सगळ्याच मुर्त्या नव्हत्या.  तिथे तोडफोड झालेली दिसत होती.  मला काहीच कळेना.  तरीही नमस्कार करून बाहेर पडलो आणि गेटजवळच उभा राहिलो.  तिथे नेहमी काम करणारी कुणी ना कुणी माणसं असायची पण आज कुणीच नव्हतं.





"रिनोवेशनच काम चालू असेल का? पण चालू असेल तर मूर्ती का काढतील? मंदिर बंद झालंय?", मी माझ्याच विचारात तिथेच थांबलो होतो.  कुणाला विचारू आणि काय करू सुचत नव्हतं.  मागच्या गुरुवारीच मी तिथे येऊन गेलो होतो आणि सगळं व्यवस्थित होत.  आता त्या मंदिराची लया पूर्ण गेली होती.  मी विचार करत असतानाच दोन वयस्कर माणसे आणि एक तरुण मुलगा तिथे आला.  त्यांनी गेटवर कापड टाकलेलं पाहिलं.

"मंदिर बंद है क्या?", त्यातल्या एकाने विचारलं.

"पता नही.  मुझे भी समझ नही आ रहा.  अंदर मूर्ती भी नही है.", मी हतबल असल्यासारखा उत्तरलो.

"जा बेटा अंदर जाके पुछ", एकाने त्या मुलाला सांगितलं.  तो मुलगा मागच्या बाजूने आत गेला.  बाजूच्या बिल्डिंगचे सेक्युरिटीची काही माणसं बाहेर खुर्च्या टाकून बसली होती.  आमच्यातला एक जण त्या सेक्युरिटी गार्डकडे जाऊन विचारू लागला तेव्हा मी ही पुढे गेलो.

"टूट जायेगा मंदिर साब.  टॉवर बननेका है इधर.  केस चालू था बहोत टाइम.  ये लोग हार गया", त्या गार्डला पण या गोष्टीच वाईट वाटलं होतं.

"फिर वो मूर्ती किधर है?", मी अधीरपणे विचारलं.

"घर पे लेके गये वो लोग.  अब उनके घर पे ही स्थापन करेंगे", त्याने सांगितलं.  एक क्षण खूप विचित्र फिलिंग मनामध्ये येऊन गेली.  म्हणजे पुढच्या गुरुवारपासून इकडे येणं होणार नाही हा विचारच कुठेतरी विचित्र वाटला.

मी दहावीला असताना आमच्या क्लासमधला मित्र मयूर आमच्या पूर्ण ग्रुपला एका गुरुवारी संध्याकाळी क्लास सुटल्यावर या मंदिरात घेऊन आला होता.  तिथे टेस्टी समोसा मिळतो, चांगला प्रसाद खायला मिळतो हे ऐकून आम्ही सगळे तिकडे गेलो होतो.  मंदिराबाहेर रस्त्यावर मोठी लाईन बघून विचार बदलला होता पण नंतर सगळ्यांनी थांबण्याची तयारी दाखवली म्हणून मीही थांबलो. जेव्हा पाहिल्यांदा बाबांची ती संगमरवरी मूर्ती पाहिली तेव्हा तिच्याशी आपोआप एक नात जोडलं गेलं.  मंदिरात मूर्तीच्या खालीच एक पाटी होती ज्यावर तिच्या स्थापनेची तारीख १९८५ सालची दिली होती.  माझ्या जन्मवर्षातलच ते मंदिर होत.  मंदिराच्या आतच एक झाड होत ज्याच्या बाजूने कठडा बांधला होता.  तिथल्या शेवबुंदीची चवही खूपच वेगळी होती. हळूहळू बाबांबरोबरच नात इतकं घट्ट झालं की  माझ्याबरोबर येणाऱ्या ग्रुपमधले मित्र काही वर्षात त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे एक एक करून गळून पडले पण मी गेली १८ वर्ष दर गुरुवारी सलग त्या मंदिरात येत राहिलो.  पाऊस असेल, रात्री लेट झालं किंवा काहीही असेल, मी मुंबईत असलो तर आवर्जून जायचो.  ते मंदिर ज्यांनी बांधलं होतं त्यांची अख्खी फॅमिली नेहमी तिकडे असायची.  नावाने ओळख नसेल तरी तोंडओळख तर खूप चांगली झाली होती.  संध्याकाळी लवकर गेलो की कधी तिथे म्हाताऱ्या बायका मिळून भजन करत असायच्या नाहीतर कधी फक्त ध्यानस्थ बसलेल्या.  रात्री लेट झालं की पुन्हा तशीच मोठी लाईन. मंदिरात यायला मिळावं म्हणून मुद्दाम माझा लेक्चर पण मी गुरुवारी संध्याकाळीच गोवंडीच्या क्लासवर लावायचो.  गोवंडीपासून मंदिरात जाताना माझं बालपण ज्या घाटल्यात गेलं तिथूनच रस्ता जात असल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा.  कधीतरी कुणी ओळखीचं भेटायचं.  कधी लेट झालं तर ठरवून कामावरून आलेल्या एखाद्या मित्राबरोबर जायचो आणि त्यानिमित्ताने गप्पा व्हायच्या.

"तू एवढ्या लांब मैत्रिपार्कला का जातो? एवढी मंदिरं असतात प्रत्येक एरियामध्ये.  इकडच्या साईबाबांमध्ये पॉवर नाय का?", कितीतरी मित्रांनी मला मस्करीत हे विचारलं असेल.  मी फक्त हसायचो. होय, मैत्रीपार्कच्या मंदिरामध्ये, तिथे जाणाऱ्या रस्त्यामध्ये , आजूबाजूच्या वातावरणात मला दर आठवड्याला चार्ज करण्याची पॉवर होती.  कारण प्रत्येक ठिकाणी माझ्या इतक्या वर्षाच्या जुन्या आठवणी दडल्या होत्या.  त्या बाबांच्या मूर्तीला इतकी वर्षे पहायची भेटायची सवय लागली होती.  पण आता इकडे मुद्दाम येण्याचं निमित्त संपलं होतं.

"त्या हारवाल्या मावशींचा धंदा तर बंद होईल आता", एकवेळ उगाच वाटून गेलं.  पण मंदिरांची आपल्याकडे कमी नाही.  त्या दुसरं मंदिर शोधून कुठे ना कुठे बसतीलच.  मंदिराबाहेर खाण्यापिण्यासाठी काहीतरी मिळेल म्हणून  नेहमी जे आजी आजोबा बसायचे तेसुद्धा आता पर्यायी जागा शोधतील.  शिवाय मीसुद्धा आता चेंबूरच्या दुसऱ्या मंदिरात जाण्याचा विचार केलाच होता.  ज्या बाबांकडे नेहमी एवढी लोक काही न काही अपेक्षा घेऊन भक्तिभावाने यायचे, बाबा त्यांची ईच्छा पूर्ण करतील या अपेक्षेवर राहायचे, त्या बाबांना स्वतःची जागाही वाचवता आली नव्हती.  त्या निर्जीव पण बोलक्या मूर्तीबद्दलही वाईट वाटून गेलं.  हे मंदिर आता माणसाच्या हव्यासापोटी जमीनदोस्त होईल आणि पुन्हा पाहायला मिळणार नाही म्हणून मी निघताना मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढून घेतले.  आयुष्यात काहीतरी गमावून बसल्यासारखा क्लासच्या मार्गाला लागलो.  मध्येच मोठा रस्ता खोदुन नवा रस्ता टाकण्याचं काम जोरदार चालू होतं.  बऱ्याच गोष्टी आता नव्याने सुरु होणार होत्या.

सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...