Skip to main content

ये उडी उडी उडी



*ये उडी उडी उडी*
- सुबोध अनंत मेस्त्री

================================================
"ए आयुष्यात कधी पतंग हातात तरी धरलेलीस का?" अजाने टोमणा मारलाच.
"हा तू मोठा शहाणा ना.  तुला येते का? मी उडवलीय लहानपणी", मी थोडा उखडलो होतो.
"सुबोध भावोजी चिडले", म्हणत पूनम चिडवायला लागली पण माझ लक्ष सध्या कणी बांधण्यात  आणि प्रसाद पासून फिरकी वाचवण्यात गुंतलं होत.  आम्ही ५ जण पतंग उडवणारे आणि फिरक्या फक्त तीनच.  त्यात दादा आणि सुनील दादा कणी बांधून पतंग उडवायला गेलेसुद्धा.  माझी आणि प्रसादची फिरकीवरून एकमेकांची फिरकी घेणं चालू होत. अजा कधी प्रसाद ची बाजू घ्यायचा कधी माझी.  मी फिरकी प्रतिभाकडे दिली आणि कणी  बांधायला सुरुवात केली.

खरं तर मी या आधी ना स्वतःहून कधी कणी बांधली होती ना पतंग उडवली होती.  लहानपणी आमच्या चाळीतला कुणी मोठा दादा पतंग उडवायचा आणि मी फिरकी धरायला उभा राहायचो.  मग एकदमच उंचावर पतंग जाऊन मूक(स्थिर) झाली कि माझ्या हातात फक्त मांजा धरायला द्यायचा.  हाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी.   बीचवर हवा जास्त असल्याकारणाने पतंग आपोआप उडेल या विचाराने आम्ही १५-२० पतंग घेऊन मालवणला गेलो होतो आणि आचरा बीचच्या सुरुच्या वनातला जेवणाचा प्लॅन झाला कि मग पतंग उडवायचा प्लॅन होता.

मी कणी बांधण्यात बिझी असतानाच प्रसाद ने हळूच येऊन प्रतिभाच्या हातातली फिरकी पळवली.  मी उगाच तिच्यावर वैतागलो.  माझी कणी  बांधून झाली आणि मग मी बीचवर जाऊन दादाची फिरकी घेतली कारण प्रसादच्या मागे धावून पुन्हा त्या अवाढव्य शरीराकडून फिरकी हिरावून घेणं माझ्यासारख्या सडपातळ माणसाला शक्य नव्हतं.  दादाची पतंग बऱ्यापैकी उंचावर गेली होती.  मी थोडासा जास्त मांजा दादासाठी राहील या हिशोबात तो तोडला आणि फिरकी घेतली. 'आता माझा नवरा पतंग उडवणार', अशा अविर्भावात प्रतिभासुद्धा कौतुकाने माझी फिरकी पकडायला आली.  पण माझी पतंग काही उडायला मागत नव्हती.  २-३ वेळा प्रतिभाने समोर जाऊन दोन्ही हातात पतंग धरून उडवली पण ती पुन्हा तशीच खाली यायची.  खूप वेळच्या प्रयत्नानंतर पतंग उडाली पण तो माझा आनंद काही फार काळ टिकला नाही.  थोडी उंच गेल्यावर ती पतंग गोल गोल फिरायला लागली आणि झाडात जाऊन अडकली.

"कणी तुटली असेल त्याची.  व्यवस्थित बांध", दादाने त्याची पतंग उडवत असतानाच लांबून सांगितलं.

मी पुन्हा एकदा नवीन पतंग घेतली आणि दादाकडून कणी बांधून घेतली.  पण ती इतक्या वेळा आपटली कि अर्धीअधिक फाटून गेली.  आता थोडा नवीन ट्राय करावा म्हणून पुढ्च्या वेळी सुनील दादाकडून बांधून घेतली.  पण ती पतंग सुद्धा काही उडेना.  प्रसादने दादाकडून पतंग उडवून घेतली आणि नंतर जशी काय त्याने स्वतःच ती बदवली आहे असा आव आणून चिडवू लागला.

"राहू दे रे सुब्या.  तुला जमणार नाही",  शरद त्याला मागून सपोर्ट  करत होता.

मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतो पण पतंग फाटण्याव्यतिरिक्त काही नवीनसुद्धा माझ्याकडून होत नव्हतं.  आता प्रतिभाचही कौतुक हळूहळू आटलं आणि दोन तीन वेळा माझा नको तो राग सहन केल्यावर ती पण दुसरीकडे खेळायला गेली.  शेवटी सगळे घरी जायला निघाले आणि मलाही पर्याय उरला नाही.  पण मुंबईत जाण्याआधी पतंग उडवायची हे माझ्या मनात मी पक्क केलं होत.  रात्री झोपताना सकाळी लवकर उठून बीचवर जाण्याचा विचार मी केला होता.  सकाळी बीचवर जास्त हवा नसते असं मला दोघांनी सांगितलं पण माझा पतंग उडवण्याचा निर्धार पक्का होता.

सकाळी उठल्यावर फक्त तोंड धुवून मी तसाच पतंग आणि फिरकी घेऊन नव्या जोशाने बीचवर निघालो.  पण पुन्हा माझे सगळे प्रयत्न फसले. उंचावरून पतंग उडेल या विचाराने बीचच्या बाजूलाच असणाऱ्या माचीवर जाऊन उडवण्याचा प्रयत्न केला. गुरफटलेला मांजा सरळ करण्यात आणि फिरकी खाली पडण्यापासून वाचवण्यात माझा वेळ वाया जात होता.  तोपर्यंत प्रसाद घरासमोरच्या आवारात येऊन "अरे जाऊ देना नाय जमत तर", म्हणून मला चिडवत होता.  त्याच्याबरोबर बाकीचे पण अधून मधून घरातून बाहेर येऊन माझी मजा बघत होते.  शेवटी कंटाळून  मी खाली उतरलो आणि  नाश्ता करायला गेलो.  नाश्ता केल्यावर कॅप घेतली आणि सरळ घराच्या गच्चीवर गेलो.  बाकी सगळे बीचवर खेळायला गेले होते.   मी पुन्हा नवीन पतंग घेतली आणि प्रयत्न चालू झाले.  पतंग सुरुवातीला काही अंतर वर जाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या हिसक्यांच्या अंदाज इतक्या वेळा फेल्युअर आल्यानंतर आता मला चांगलाच आला होता.  काही वेळाने हा अंदाज कामी आला आणि माझी पतंग वर जायला लागली.  ती इतकी वर गेली का माझ्या फिरकीचा मांजा संपला.  मला हे ओरडून सगळ्यांना सांगायचं होत पण घरात कुणीच नव्हतं.  मी संपलेल्या फिरकीचा मांजा तोडला आणि तो दुसऱ्या फिरकीला बांधला.  आणि पतंग जाईल तितकी लांब जाऊ दिली.  आता पतंग खूप उंचावर जाऊन स्थिर झाली होती,  प्रतिभाने घराखालून जाताना माझी पतंग बघून मला कॉम्प्लिमेंट दिली.   अजा दादा वैगेरे बीचवर जाऊन परत आले होते.

"शेवटी उडाली तुझी पतंग ", अजाने माझ्या हातातून मांजा घेऊन स्वतः उडवायला लागला.

"उडणार तर होतीच", मी अभिमानाने म्हणालो.  असंही दादाने पहिल्या दिवशी पतंग उडवताना सांगितलंच होत.  "पतंग काही अंतरावर नेईपर्यँत त्रास असतो.  तिला हिसके द्यावे लागतात.  एकदा ती वर गेली कि मग आपोआप जातच राहते."

त्या उंच गेलेल्या इवल्याश्या पतंगाकडे पाहिल्यावर एका गोष्टीच समाधान होत, "याच्यासारखंच एका लेव्हलची उंची गाठण्यासाठी आयुष्यात स्ट्रगल आहे.  बरेच हिसके सहन करावे लागतील.  पण त्यानंतरची उंची आपोआप गाठली जाणार.  पण सुरुवातीला पतंग सारखा जमीन बघत असताना कितीवेळा प्रयत्न करायचा आणि तो उडल्यानंतर मांजा कुठपर्यंत सोडायचा हे फक्त आपल्याला ठरवायचं आहे".

================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656


#sahajsaral

Comments

  1. बंधू... खूप सुंदर, तुझं लिखाण आणि तुझी जिद्द अप्रतिम आहे..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी