Skip to main content

जगून घ्या



माझा हा लेख त्या मित्रांसाठी आहे जे आज धावण्याच्या गडबडीत जगणं विसरले आहेत. आवर्जून वाचा.
===================================
2 दिवसापूर्वीच एक विचित्र घटना कानावर पडली आणि मन सुन्न झालं. दादाचा खास मित्र विजय याचा अपघाती मृत्यू झाला. त्याची बायको हि त्याची शाळेपासूनची प्रेयसी म्हणजेच 20 अधिक वर्षाची दोघांची ओळख आणि लग्नानंतर यांना एक पाच वर्षाची मुलगी त्रिशा. दादा मला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत होता. दादा आणि विजयने सोसायटीमध्ये एकत्र बरेच सण एकत्र साजरे केले होते आणि त्यामुळे त्यांची यारी जबरदस्त जमली होती. प्रत्येक पार्टीची जान होता विजय. दादाने त्याला कधी नाराज पहिलाच नव्हता. तो फक्त नाराज असायचा त्याची मुलगी आजारी असताना. त्याचा त्रिशा वर खूप जीव आणि तिलाही सारखा बाबाच लागायचा. त्रिशा आजारी असताना तो दादाला नाराजीने सांगायचा, "त्रिशा आजारी आहे रे. ती जेवत नसेल ना तर मलाही जेवण जात नाही. हि लहान पोर खेळता खेळता शांत झाली कि कशात मन लागत नाही.". गटारी एन्जॉय करायची म्हणून विजयच्या सगळ्या मित्रांनी रेसॉर्ट वर पिकनिक प्लॅन केला.
पिकनिकला निघताना तो आईची मस्करी करत होता. त्याने आईला सांगितलं कि, "पार्टीमध्ये मी खूप दंगा करणार, भरपूर नाचणार, मजा करणार". पण कोण जाणे का? त्या दिवशी त्याने जाऊ नये असं सारखं तीला वाटत होतं. तो तस करणार असेल तर बोलणार नाही अशीही अट तिने घातली होती. घरातून निघताना त्याने आईला खूप वेळा जातो सांगितलं, जवळ घेतलं पण आई त्याच्याकडे मुद्दाम बघत नव्हती. तो अगदी निघेपर्यंत तिला बाय करत होता पण आईने लक्ष दिल नाही. हा निरोप शेवटचा असेल याची कल्पना तिला तरी कुठे होती. तो निघून गेला तो कायमचाच. त्रिशा मात्र सोसायटीमधल्या तिच्या लहान मित्रांना सांगते कि, "माझा पप्पा मेला". विजय मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर असल्याने तो नेहमी दोन महिन्यातून एक फॉरेन टूर करायचा आणि काही दिवस बाहेर असायचा. तिला तसाच काहीसा प्रकार वाटला असेल. तिलाही या शब्दाची कल्पना नसावी कि तिचा पप्पा पुनः कधी फिरून येणार नाही. गेल्या वर्षभरात बऱ्याच मित्रांबद्दल माझ्या कानावर अशा गोष्टी आल्या आहेत. काही अपघातात गेले, काही अटॅकने. पण होते सगळे जवळपास माझ्याच वयाचे. आणि त्यात आता हि महाडची पूल वाहून गेल्याची दुर्घटना. माणसाचं आयुष्य किती अनिश्चित आहे. हे सगळ ऐकत असताना हॅपी जर्नी या मराठी चित्रपटातला एक डायलॉग मला आठवत होता, "आपल्या आजूबाजूला असणारी, आपली वाटणारी माणस अशी अचानक गायब होतात. कुठेतरी लांब निघून जातात आणि पुन्हा परत कधीच येत नाहीत. ती गेल्यावर कळतं कि याच्याबरोबर खूप चांगले क्षण जगायचे राहून गेले". आज आपल्याबरोबर असणारी व्यक्ति उदया आपल्याबरोबर असेल हे कुणाला माहीत आहे? बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांना दुखवतो, वाईट बोलून जातो, प्रेमाने जवळ करत नाही किंवा त्यांचं आपल्या आयुष्यातलं महत्व त्यांना स्वतः कधी सांगत नाही. आपला गर्व किंवा "मीच का?" हा स्वभाव आपल्याला आडवा येत असतो. पण बऱ्याच वेळेला हे बोलणं कायमच राहून जात. म्हणून जे तुमच्या आयुष्यात महत्वाचे आहेत, आई, बाबा, भाऊ, बहीण, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी त्यांना आजच सांगा कि त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे. तुमचे एकत्र घालवलेले क्षण त्यांच्याबरोबर शेअर करा. जुन्या आठवणी खोदून काढा. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊ द्या. त्या हास्याच कारण तुम्ही बना. त्यांचं ऐका. त्यांच्यावर मनसोक्त निःस्वार्थी प्रेम करा. कारण कोणती भेट शेवटची असेल हे फक्त नियतीलाच माहित.
दुसरी गोष्ट आवर्जून या घटनेतून लक्षात आली आणि जी मला मित्रांबरोबर शेअर करावीशी वाटली. काही लोक जगायचं विसरून गेले आहेत. फक्त जॉब करणं, शनिवार रविवार सुट्टी मग त्यात एखादी फॅमिली पिकनिक करायची किंवा आराम करायचा हाच एक मशीन पद्धतीने शेड्यूल ठरलेला असतो. त्यांनी हि आयुष्य जगण्याची व्याख्याच बनवून टाकली आहे. ऑफिसच पॉलिटिक्स आणि संसार हे त्यांचे दोन चघळण्याचे विषय. भविष्यासाठी खूप सारा पैसा कमावणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अख्ख तारुण्य यांनी पणाला लावलेलं आहे. हेच मित्र मला विचारतात, "तू एवढ्या सगळ्या गोष्टी कशा करतो रे? तू बिजनेस पण करतो, सोशल ऍक्टिव्हिटी पण करतो, मोठे इव्हेंट करतो, त्यात नाटकात पण काम करतो, खेळायला जातो, फिरायला जातो, ट्रैनिंग घेतो आणि ट्रैनिंग देतो पण. क्लासमध्ये शिकवतो. वाचतो, लिहितो. कधी मध्येच ब्लेझर घालून मोठ्या लोकांबरोबर फोटो तर कधी मित्राबरोबरचे फोटो. तू वेळ मॅनेज कसा करतो?" बऱ्याच वेळेला हा प्रश्न 'माझा एकाच गोष्टीवर कल नाही' अशा प्रकारच्या टोमण्याच्या सुरात असतो. माझं या प्रश्नावर एक सोप उत्तर तयार असत, "मी जगतो फक्त. मी उद्या असेन कि नसेन हे मला माहित नाही, पण जेव्हा डोळे मिटेन तेव्हा या जगण्याच्या धावपळीत एखादी गोष्ट करायची राहून गेली अशी फिलिंग माझ्या मनात नसेल एवढी काळजी घेतो". बऱ्याच वेळेला हे उत्तर टिंगल टवाळी मध्ये घेतलं जात. पण जो भूतकाळात अडकलेला आहे आणि भविष्यात काय होणार याच्या चिंतेत गुरफटला आहे तो वर्तमानात काय जगणार अस समजून मी दुर्लक्ष करतो. शेवटी प्रत्येकाची आयुष्याची व्याख्या ठरलेलीच आहे. पर जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही. शेवटी एका गाण्यातही सांगितलंच आहे, "हर पल यहा जी भर जियो, जो है समा कल हो ना हो"

- सुबोध अनंत मेस्त्री
9221250656


#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...