“काकी तू आता रिटायरमेंट घेऊन पुस्तक लिहायला हवंस” अस कित्येक वेळा काकीशी बोलणं झालं असेल. तिची मुख्याध्यापिकेची नोकरी, तिथली जबाबदारी, तिची समाजसेवी कामे यातून तिला तशी फुरसत मिळणं कठीणच. त्यात २५-३० वर्षापूर्वी झालेलं तिचं फुफुसाचं मोठं ऑपरेशन. एवढ्या अवघड परिस्थितीतून नोकरीतल्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची तब्येत सांभाळत लिखाण करणं थोडं अशक्यच होतं. पण तिचे विचार लोकांपर्यंत पोहचायला हवेत या अनुषंगाने आम्ही तिला विनंती करायचो. आणि शेवटी ते स्वप्न पूर्ण झालं.
काही दिवसांपूर्वी कवितेचं पुस्तक करायचं अस काकीने बोलून दाखवलं आणि आम्ही कामाला लागलो. कोणत्या ना कोणत्या स्पर्धेच्या निमित्ताने काकीने प्रासंगिक कविता केल्या होत्या व त्यात तिला बक्षीसही मिळाली होती. सगळ्याच कविता अप्रतिम होत्या. कौतुक म्हणजे वीस एक वर्षापासूनच्या या सगळ्या कविता काकीने जपून ठेवल्या होत्या. प्रत्येक कवितेवर टाकलेल्या तारखेमुळे आम्हाला ते कळालं. पुस्तकावर काम करण्याचा उत्साह वेगळ्या लेव्हलचा होता कारण हे पुस्तक मॉरिशसला प्रकाशित होणार होतं. समीरच्या मिडाशियन टचने पुस्तकाच अप्रतिम डिजाईन झालं आणि अखेरीस आमच्या कुटुंबातलं पहिलं “आनंदयात्री मी” हे पुस्तक विदेशात प्रकाशित झालं. कुर्ल्याच्या शाळेतून एक शिक्षिकेचा सुरू झालेला हा प्रवास एका कवयित्रीपर्यंत आलेला आहे ही आम्हा सगळ्यांसाठीच एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. यापुढे काकीची कवितांची अनेक पुस्तकं येतच राहतील पण सौ. अनिता रामचंद्र मेस्त्री लिखित एखादं कथा, कादंबरी किंवा तिच्याच स्ट्रगलवर आधारित एखादं पुस्तक येईल हे नक्की. आता तर फक्त सुरुवात झालीय.
कठीण परिस्थितीमध्ये हार न मानता कायम चेहऱ्यावर स्माईल ठेवून कसं पुढे जात राहिलं पाहिजे आणि स्वप्न कशी पूर्णत्वाला नेली पाहिजेत याबाबतीत अप्पा आणि काकी कायम आमचे आदर्श राहिले आहेत आणि यापुढेही राहतील 

Comments
Post a Comment