"सुबु, पी. एम्. ने एकवीस दिवस लॉकडाऊन अनाऊन्स केला आहे. आज रात्री १२ पासून सुरु होणार", दादा न्यूज वाचून कठड्यावरून उठून उभाच राहिला. मी गाडीवर पाणी मारता मारता थांबलो. काही क्षण आम्ही सगळे एकमेकांकडे फक्त पाहत राहिलो. पडवीत चालू असणाऱ्या गप्पा अचानक थांबल्या.
आम्ही १८ तारखेलाच पालखीच्या निमित्ताने गावाला गेलो होतो आणि २२ ला सकाळी परत निघण्याचा प्लॅन होता. आम्ही निघालो त्यावेळी कोरोनाबद्दल जास्त काही केसेस नव्हत्या. पालखीला पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र चाललो होतो. काकांच्या गावाला पालखी करून, आत्यांकडे आणि मग मामाकडे अशी काही गावं फिरून मुंबईला परत येण्याच ठरलं होतं. आमच्या वाडीत पालखीचा कार्यक्रम व्यवस्थित झाला. गावातल्या अजून बऱ्याच वाड्या पालखी घेणार होती. म्हणजे अजून सातेक दिवस पालखी फिरणार होती. आमच्या इथून पालखी गेल्यावर ठरल्याप्रमाणे आम्ही आत्येच्या गावाला गेलो. शुक्रवारी पंतप्रधानांनी २२ तारखेचा कर्फ्यु अनाऊन्स केला आणि आमचा परतण्याचा प्लॅन एक दिवस पोस्पॉंन झाला. शनिवारी मामाकडे आल्यानंतर सतत न्यूज चॅनेल चालू होतं. "अरे ते उद्या वायू सोडणार आहेत आकाशातून कसलासा. वायरसला कायमचा संपवण्यासाठी. म्हणून घराच्या बाहेर पडायचं नाही", मामा असाच काहीसा ना पटणारा तर्क आम्हाला सांगत होता. आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकत नाही म्हटल्यावर त्याच्या तर्कावर त्याला आम्ही सोडून दिलं. देशातली बिघडत चाललेली परिस्थिती आम्ही सोशल मीडिया आणि चॅनेलवर पाहत होतो. दोन दिवस दुसऱ्या गावांमध्ये रेंज नव्हती. आम्ही काकांच्या गावावरून निघाल्यावर त्या दिवशी संध्याकाळीच पालखी थांबवली अशी बातमी काकांनी फोनवरून दिली. आता जास्त कुठे फिरू नका असा सल्लाही दिला. जी परिस्थिती आपल्या हातात नाही त्यावर चिंता करत बसण्यापेक्षा जमेल तसा वेळ आनंदात घालवण्याच्या विचाराने आम्ही आमच्या पद्धतीने घरातल्या घरात एन्जॉय करत होतो. मामाच्या घरात आम्ही धरून जवळपास बावीस लोक. त्यामुळे घरात एखादं मंगलकार्य असल्यासारखीच स्थिती. अंगणात क्रिकेट खेळण्यापासून ते घरात लहान मुलांच्या डान्सचा कार्यक्रम, गाणी, वेगवेगळे पदार्थ सगळी धमालच चालू होती. मामाच्या घरात काही तास थांबणारे आम्ही पूर्ण दोन दिवस राहणार म्हणून सगळेच खुश होते. फक्त बाहेर फिरता येणार नाही एवढीच काय ती खंत. पण मामाचं घर आणि घरामागचं शेत खूप मोठं होतं. त्यातल्या त्यात फिरायला बरीच जागा होती. मित्रमंडळी व्हाट्सएपवर सतत विचारपूस करत होती. गावी आहे समजल्यावर "तिकडेच राहा. इकडे येऊन फ्लॅटमध्ये कोंडूनच घ्यायचंय" असा सल्लाही देत होती. मध्ये मध्ये जमेल तसे ऍमेझॉन प्राईमवर मुव्ही बघून वेळ काढत होतो. पण आमचं मन आम्हाला वेगळयाच कारणाने खात होतं.
पुढे अशी परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज नव्हता म्हणून आई-पप्पांना मुंबईलाच ठेवून आम्ही निघालो होतो. त्यामुळे इतकी धमाल असूनही गावात मन लागत नव्हतं. आई-पप्पांना सतत व्हाईस कॉल आणि व्हिडीओ कॉल्स चालू होते. "आमचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही तिकडे व्यवस्थित राहा", हेच ते दोघे सांगत होते. पण आमचं काही मन रमेना. रविवारी संध्याकाळी रात्री ९ पर्यंत असणारा कर्फ्यु सकाळी ६ पर्यंत वाढल्याची न्यूज आली. सोमवारी सकाळी किंवा जास्तीत जास्त मंगळवारी निघण्याचा बेत आम्ही डोक्यात ठेवून होतो आणि पुन्हा काही तासांनी १४४ कलम लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसे आम्ही ४ जण मोठे होतो आणि दोन लहान मुलांना धरून सहा जण होत होतो. पाचच्या वर एकत्र व्यक्ती दिसल्यास कायदेशीर कारवाई होणार या विचाराने आम्ही इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादांना फोन केला. त्यानीही दोन दिवस गावालाच थांबण्याची सूचना दिली. आता यापुढे काही करू शकत नाही. ३१ पर्यंत असंही ऑफिस आणि वाहतूक बंदच होती. आम्ही सगळ्यांनी मानसिक तयारी करून ठेवली होती की कदाचित ३१ तारखेपर्यंत गावालाच थांबावं लागेल.
त्यात आपल्यातल्या काही लोकांचा अतिउत्साहीपणा सोशल मीडिया आणि बातम्यांच्या माध्यमातून पहायला मिळाला. कर्फ्युच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधानांनी खिडकीतून किंवा गॅलरीत उभे राहून टाळ्या, घंटानाद आणि शंखनाद करायला सांगितलेलं असताना काही लोकांनी चक्क रस्त्यावर उतरून गरबा खेळण्यापासून ते वरात काढण्यापर्यंत अतिशहाणपणा केला. सरकारने लोकांनी एकत्र येऊ नये म्हणून दिवसभराचा कर्फ्यु लावला होता तो लोकांच्या या मुर्खपणामुळे जवळपास वाया गेला होता. "अशा रां**च्या गां**र पोलिसांचे बांबूच बसायला पाहिजेत", काही वेळापूर्वी न्यूजमध्ये दाखवलेल्या कर्फ्युमध्ये बाहेर फिरणाऱ्या माणसांना पोलिसांनी दिलेल्या फटक्यांची मामाला आठवण झाली असावी. "फो**ना एवढं पन कलत नाय? सरकार सांगतंय सगले जमू नका, आनी हे मिरवनूका काढतायत", मामाला या गोष्टीचा राग आला असावा. साहजिकच होतं. इतकी वर्ष गावात राहिलेल्या अशिक्षित मामाला हे सगळं कळत होतं पण शहरात असणाऱ्या सुशिक्षित लोकांना हे कळू नये याचं नवल वाटत होतं. लोकांनी कोरोना अजून सिरियसली घेतला नाही आणि त्यामुळे पुढे होणारे भीषण परिणाम यावर चर्चा सुरू झाली. चीनने केला तसा लॉकडाऊन आपल्यालाही करावा लागेल तरच परिस्थिती सुधारणार, वाढत्या पेशंटचे आकडे बघून हे आम्हाला वाटत होतं. त्यात गावातली आणि मुंबईतून आलेली बरीच मूलसुद्धा एकत्र मिळून शेतात क्रिकेट खेळायचे. त्यांना एक-दोन वेळा पोलिसांनी फटकारल्यावर ते पळून जायचे. पोलीस हे सगळं आपल्यासाठी करतायत हे त्यांच्या लक्षात येत नसावं किंवा त्यांना समजून घ्यायचं नव्हतं. ते खेळत राहायचे आणि पोलिस दिसले की रानात पळून जायचे. एकंदरीत सगळं चित्र विचित्र होत चाललं होतं.
मंगळवारी सकाळी बातमी आली की, 'रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप फक्त दुचाकीला पेट्रोल देणार'. लोकांनी गाडी घेऊन सतत बाहेर पडू नये म्हणून ही खबरदारी. संध्याकाळी पूर्ण भारतात तो नियम लागू केला गेला. नशिबाने मी मामाकडे येण्यापूर्वीच गाडीचा टॅंक फुल केला होता. तरीही पेट्रोल जपून वापरावं या विचारात आम्ही होतो. जेव्हा निघायची संधी मिळेल तेव्हा निघायचं हे आमचं ठरलेलं होतं. सगळी मंदिरं, प्रार्थनास्थळे बंद केली गेली. "अजूनही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येऊन नमाज अदा करतायत.", दादा मला सांगत होता, "तुमचा तुमच्या देवावर विश्वास नसेल पण आमचा आमच्या अल्लावर आहे, असं त्यांचं म्हणणं आहे". माणसाची सगळी पापं बॅलन्स करण्यासाठीच नैसर्गिक शक्तीने हे सगळं आरंभलय हे कुठेतरी वाचलेल वाक्य माझ्या डोळ्यासमोर तरळून गेलं.
कर्फ्युनंतर दोन दिवस आम्ही घरातच होतो. दादाला ए. टी. एम. मधून पैसे काढायचे होते म्हणून गाडी घेऊन आम्ही संध्याकाळी बाजारात गेलो. गुढीपाडव्याच्या आधीचा दिवस म्हणजे या बाजारात जत्रेच वातावरण असतं. पालखी नाचवण्याची स्पर्धा होते. रंगपंचमीला घराबाहेर पडलेली पालखी गुढीपाडव्याच्या दिवशी पुन्हा मंदीरात जाते. पण यावर्षी इथे पूर्ण शुकशुकाट होता. ए. टी. एम. बाहेर रुमालाचे मास्क केलेल्या लोकांची थोडी रांग होती. बाजूचं एकच दुकान उघडं होतं. गजबजलेल्या त्या ठिकाणी मी कायम जात असल्याने मला आज मार्केट खूप भकास वाटलं. घरी परत आल्यानंतर गुढीपाडव्याला गाडीची पूजा करायची म्हणून पडवीच्या लाईटच्या उजेडात अंगणामध्ये गाडी धुवायला घेतली होती. श्यामने पाण्याचा पाईप नळापासून गाडीपर्यंत खेचून आणला होता. गाडी जवळपास धुवून होते न होते तोच दादाने हा लॉकडाऊनचा बॉम्ब टाकला होता.
"काय करायचं?", दादाने विचारलं.
"अडकून बसणार आपण २१ दिवस. निघालो तर आत्ताच. दादांना फोन लावून बघ", मी दादाला सुचवलं. दादाने इन्स्पेक्टर संजय दादांना कॉल लावला. त्यांनी तो उचलला नाही. "थांब नानांना लावतो", दादाने पटकन फोन करून अरुण सरांना कल्पना दिली. त्यांनी ऍडव्होकेट संदीप सरांना फोन करायला सांगितला. संदीप सरांनी ताबडतोब निघायला सांगितलं. "अडवलंच तर मला कॉल कर केव्हाही", अशी सूचना करून ठेवली. इतका वेळ आम्हा दोघांची गडबड घरातले बाकी सगळे बघत होते. मी घड्याळ पाहिलं. रात्रीचे ८.३५ झाले होते. जर आता इथे थांबलो तर २१ दिवसात आई पप्पांचा मोठा प्रॉब्लेम होईल हे स्पष्ट दिसत होतं. "चल निघुया", मी मोठ्या निर्धाराने दादाला सांगितलं. "अजून लॉकडाऊन सुरू व्हायला ३ तास आहेत. आपण बऱ्यापैकी पुढे निघून जाऊ. त्यापुढे जे होईल ते पाहू", मी बाहेरच्या दरवाजाला आतल्या बाजूने अडकवलेली पॅन्ट काढत म्हटलं. मामाच्या घरात हे सगळं अनपेक्षित होतं. पण परिस्थितीचं गांभीर्य त्यांनाही कळत होतं. "बावानो जेवन झालंय. जेवून जा थोडं थोडं", मामी आर्जव करायला लागली. जेवणात अर्धा पाऊण तास सहज मोडेल या हिशोबाने तिला जेवण डब्ब्यात द्यायला सांगितलं. सगळेच गोंधळात पडले. आम्ही खरंच निघतोय का हा प्रश्न प्रत्येकाकडे होता. पण पुढच्या ५ मिनिटात सगळ्या बॅग आवरून आम्ही डिक्कीत टाकल्या. मामीने घाईघाईत डब्ब्याची पिशवी आणि उद्या सकाळसाठी ठेवलेलं घावण्याचं पीठ मला पिशवीत भरून आणून दिलं. श्यामुने दुपारी काढलेला नारळ आणून डिक्कीत टाकला. सूर्याने गाडीवर घाई घाईत स्वस्तिक काढलं. किचनमध्ये स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या वहिन्या धावत दरवाजाजवळ आल्या. मामाची नातवंड आणि सगळ्यांच्या डोळ्यात जवळपास पाणी दाटल. इतक्या वर्षाने ४ दिवस सलग राहिल्यावर आम्ही असे अनपेक्षितपणे निघू याची त्यांनी कल्पना केली नसावी. सगळ्यांच्या घाईघाईत पाया पडून लहान मुलांना जवळ ओढून त्यांचे मुके घेत घेत आम्ही गाडीत बसलो. सगळे गाडीच्या दरवाजाजवळ उभे होते. "सावकाश जा रे बावा. पोचलात की फोन करा.", सगळे रिपीट रिपीट तेच बोलत होते. पावणेनऊला आमची गाडी तिकडून हलली.
आता पुढचं शिवधनुष्य माझ्याकडे होतं. मी यापूर्वी नाईट ड्राइविंग कधीच केली नव्हती. त्यात घाटाचे, वळणावळणाचे रस्ते. रात्रीची झोप झाली नव्हती आणि दुपारीही झोपलो नव्हतो. पोटात भूक होती आणि मनात भीती होती पण आता फक्त आई पप्पा दिसत होते. काही एक झालं तरी घर गाठायचंच या विचाराने गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंधार चिरत गाडी गावातून बाहेर पडली. जिथे दुकान उघडं दिसेल तिथून बिस्कीट किंवा काही छोटे मोठे खाण्याचे पदार्थ घेत आम्ही निघालो. वर्षाचे १२ महिने बिजी असणारा बॉम्बे गोवा हायवे पूर्ण रिकामी होता. गावाच्या पूर्ण टूरमध्ये आमची गाडी दोन वेळा बंद पडली होती. निघताना जर रस्त्यात गाडी बंद पडली तर आम्हाला मदतही मिळणार नाही अशी अवस्था. मला भूक लागली की दादा बिस्किटचा पुडा फोडायचा आणि मला बिस्कीट भरवायचा. गाडी नॉन स्टॉप चालावी म्हणून हे प्रयोजन.
जवळपास पुढच्या २-३ तासांमध्ये आम्हाला फक्त १-२ गाड्या दिसल्या असतील. पण जसे जसे आम्ही पुढे निघालो तशा मुंबईवरून गावाला जाणाऱ्या बऱ्याच गाड्या समोरून यायला लागल्या. २१ दिवस लॉकडाऊन ऐकून लोकांनी गावचा मार्ग धरला हे आम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं. समोरून येणाऱ्या एका गाडीच्या ड्रायवरने हात दाखवून आमची गाड़ी थांबवली व पुढे कोणत्या चेकपोस्ट आहेत का? पोलीस अडवतायत का? याची विचारणा केली. पेणला आल्यावर आम्हाला एक चेकपोस्ट लागली पण त्यात फक्त गावाकडे जाणाऱ्या गाड्या अडवल्या जात होत्या. कारण अशाही मुंबईला जाणाऱ्या गाड्या नव्हत्याच. आम्ही सहज तिथून गाडी काढली आणि मुंबईचा रस्ता धरला. पुढे पुढे समोरून येणाऱ्या गाड्यांचा ओघ वाढतंच गेला.
गावाकडे अजूनही कोरोना पेशंट नव्हतेच आणि मुंबईला कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चालू झाला होता. २१ दिवस मुंबईच्या घरात स्वतःला कोंडून घेण्यापेक्षा गावातल्या गावात फिरता तरी येईल या अपेक्षेने या समोरून येणाऱ्या गाड्यातून किती कोरोना पेशंट गावाकडे हा कोरोनाचा संसर्ग घेऊन चालले होते याचं गणित त्यांच्याकडेही नसेल. हा लॉकडाऊन म्हणजे सुट्टी नाही तर आणीबाणीची परिस्थिती आहे हे या आपल्या लोकांना बरंच मोठं नुकसान झाल्यावरच कदाचित लक्षात येईल.
- सुबोध अनंत मेस्त्री
Subu u r simply great. Hat's off to your courage and safe driving. Love u
ReplyDeleteDada khup chhan....
ReplyDeleteसुबु,
ReplyDeleteजसा तु गावावरुन मुंबईला आलास, तसा मी मुंबईतून गावी जावू शकलो नाही, याचं वाईट वाटतयं,
परवाच बाबूरावने कमेंट टाकलेली,
"आमच्या जखमेवर मीठ चोळू नका"
पण तुझी पोस्ट ती फुंकर वाटली,
आणि,
आठवडा झाला,
सर्वांना माझं वाचनवेड माहिती असल्याने, मी खुप काही या दिवसांत वाचलं असेल असा ग्रह होतो,
पण काहीच वाचलं नाही,
ना पुस्तक
ना लेख
सलग वाचलेला हा तुझा लेख,
लेख कसला प्रवास...!
विनूने जाहिरपणे आईपप्पांवरील प्रेम व्यक्त केलयं,
आणि तुझ्या बोलण्यातून मी कमी वेळा ते ऐकलयं, पण जेव्हा लिहतोस, तेव्हा डोळे नकळत ओलावतात,
...
ग्रेट, सुबू.
लिहीत रहा...!
खूप छान विश्लेषण सुबोध सर,
ReplyDeleteखरंच Lockdown, वगैरे हे सगळं आपल्यासाठी अनपेक्षित असच होतं...
फार कमी शब्दात प्रसंग उभा केलाय तुम्ही !!!
लेख वाचताना प्रत्येक वाक्याचा फिल येत होता...
खूप छान विश्लेषण सुबोध सर !!!
ReplyDeleteफार कमी शब्दात प्रसंग उभा केलात. लेख वाचताना त्यातील प्रत्येक वाक्याचा फिल येत होता...
खरंच खूप सूनदर पद्धतीने सगळा प्रसंग चितारला आहेस सुबोध.
ReplyDeleteमी पण सगळं तिथे असल्यासारख अनुभवलं.सुखरूप आलात त्यातच सगळं आहे.