Skip to main content

वाघ रस्त्यावर...




=================================================================================

हे शीर्षक वाचून मला वाघ दिसला असा तुमचा समज झाला असेल तर तसं नाही. नुकतंच अनिल अवचट यांचं "दिसले ते" पुस्तक वाचलं. त्यात याच शीर्षकाचा एक लेख होता. वाघ लोकांच्या वस्तीत फिरू लागले की लोकांनी जायचं कुठे? याउलट जर आपण त्यांच्या वस्तीवर आक्रमण करतोय तर त्यांनी जायचं कुठे? हा प्रश्न त्यांच्या अनुभवांसकट त्यांनी खूप मस्त शब्दात मांडला होता. तो लेख वाचताना काही माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या या लेखाद्वारे तुमच्यासमाेर मांडतोय.

=================================================================================

माझं लग्न झालं आणि त्यावर्षी गणपतीत आम्ही गावी गेलो होतो. श्रावणातलं कोकण म्हणजे स्वर्गाचं आपल्या मनी रेखाटलेल चित्र अगदी तसाच. सगळीकडे फक्त हिरवंगार वातावरण. वाहणारे ओढे आणि नद्या आणि त्यांचा होणार नादयुक्त एकलयी आवाज. सगळं वातावरण एकदम प्रसन्नच असत. आम्ही नवं जोडपं असल्याने पप्पा आम्हाला आमच्या बऱ्याच नातेवाईकांची गाव फिरवणार होते त्यामुळे मी मोठी सुट्टी टाकून गावाला गेलो होतो. त्यातलं एक गाव होतं रोहिले. माझ्या आत्येची (आम्ही तिला माई म्हणतो) मुलगी शैलाताई तिकडे राहते हे मला माहित होतं. भावोजी बऱ्याच वेळेला काही ना काही निमित्ताने मुंबईत येऊन गेले होते पण ताईला मी खूप लहान असताना पाहिलं होतं. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी आम्ही भेटणार होतो. तीच गाव समुद्राच्या किनाऱ्यालाच आहे आणि गावाला जाणारा रस्ता समुद्राला वळसा घालून जातो असं पप्पानी सांगितलं होतं त्यामुळे माझी उत्सुकता अजून वाढली होती.

आदल्या दिवशी मूर्तवडेला माईच्या घरी आलो व तिथून अबलोलीमार्गे रोहिल्यात जायचं होतं. मूर्तवडे ते अबलोली प्रवास एस. टी. ने सहज झाला. माई आणि तिचा मुलगा विकास दादापण आमच्यासोबत आले होते. एस. टी. तून जाताना विकास दादाने दोन मोठ्या उधाणलेल्या नद्यांचा संगम आम्हाला दाखवला. नुकताच मुसळधार पाऊस पडून गेला असल्याने नद्यांच पाणी पूर्ण गढूळ झालं होत. दोन बहिणी बऱ्याच वर्षांनी एकमेकांना पाहिल्यावर जशा धावत येऊन एकमेकींंच्या मिठीत विलीन होऊन जातील तसंच त्या उधाणलेल्या नद्यांचे प्रवाह दोन्ही बाजूनी एकत्र येऊन एकमेकांवर आदळून विलीन होऊन पुढे जात होते. तो फोर्स एवढा जास्त होता की त्यात चुकून मोठा हत्ती जरी पडला तरी तो पुढच्या क्षणाला दिसेनासा झाला असता. थोडं पुढे गेल्यावर एक मोठी नदी आणि सागराचा संगम पण दिसत होता. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आणि प्रतिभासाठी खूप नवीन होत्या. अबलोलीच्या पुढे जाण्यासाठी गाड्या कमी होत्या. पुढच अंतर आम्हाला प्रायव्हेट रिक्षाने गाठाव लागलं. ती रिक्षा जेव्हा समुद्राला वळसा घालत होती तेव्हा तो चमचमणारा समुद्र, मध्ये लागलेलं सुरुच्या झाडांचं बन आणि पुढे चकचकीत वाळूचा लागलेला मोठाच्या मोठा बीच हे सगळं मनामध्ये एका चित्रासारखं कोरल गेलं.

पुढे एक छोटा पूल क्रॉस करून रिक्षा थांबली. पुलाखालून मोठी नदी वाहत होती. नदीच्या उजव्या बाजूला काही नारळाची झाड आणि काही घरं दिसत होती. डाव्या बाजूला नदीच्या किनाऱ्यापासूनच झाडी आणि डोंगर सुरू होत होता. मला ती घरं पाहून तिकडे जायचय अस वाटलं होतं पण उलट झालं. दादा त्या रस्त्याला लागून जंगलाकडे जाणाऱ्या पायवटेला घुसला. त्याच्या मागून आम्ही बॅग घेऊन निघालो. थोडं अंतर चालल्यावर वाटेत एक खूप जुनाट कौलारू घर लागलं. कोकणात अस एकदम कोकणी थाटातलं घर मी खूप वर्षांनी पाहिलं. पुढे आंगण, तिथून दोन पायऱ्या चढलो की आडवी मोठी पडवी, त्याच्या वर ओटा आणि मग दरवाजा. घर पूर्ण मातीच होत. विकास दादाने सांगितलं ते 300 वर्ष जून घर होतं. आमच्या आवाजाने तिथे घरी असणाऱ्या एक पंचेचाळीशितल्या काकू बाहेर आल्या. त्या विकास दादाला ओळखत होत्या. त्यांनी विचारपूस केल्यावर आम्ही पुढे निघालो. पुढे दोन तीन मिनिट चालल्यावर एक फाडीच घर लागलं. घरापुढे छोटं मोकळं आंगण होत आणि पुढे पुन्हा जंगल चालू होतं होत. वातावरण एकदम मस्त होत. आम्ही सगळेच खुश झालो होतो. भावोजी आणि ताई आमची वाट बघत होतेच. घरी जाऊन फ्रेश झालो नाश्ता करून मी, प्रतिभा, विकास दादा आणि शैलाताईचा मुलगा जो त्यावेळी दहा बारा वर्षांचा असेल असे आम्ही नदीकिनारी गेलो. निघताना जास्त जंगलात जाऊ नका असं शैला ताईने सांगितलंच होत. नदी लांबच्या लांब पसरली होती. मला वाटलं होतं की ही दोन घरं सोडून आजूबाजूला पुढे अजून घरं असतील पण पुढे फक्त जंगलच होतं.

फिरून घरी आल्यावर शैलताईचा मुलगा बाजूच्या मुलांबरोबर खेळायला गेला आणि थोड्या वेळाने धावत "आये आये" ओरडत घरी आला. आमच्या घरी गप्पा चालू होत्या.

"आये, वरती नदीच्या काठावर दगडावर रानातला बसलाय. त्याला बघून सगले पलाले", कोकणातल्या माणसांची "ळ" आणि "ल" मध्ये गडबड असतेच. मला रानातला म्हटल्यावर समजलं नाही म्हणून मी ताईला विचारलं तेव्हा समजलं की तो वाघाबद्दल बोलत होता. ते ऐकून आम्हाला धडकीच भरली. प्राणीसंग्रहालयामध्ये पिंजऱ्यात फिरणारा वाघ बघतानाच दहशत वाटते आणि इथे हा जंगलात मोकळा फिरणारा वाघ आणि तोही फक्त काही अंतरावरच होता हे ऐकुन पोटात गोळा आला.

"वाघ आहेत इथे?", प्रतिभाच्या तोंडून भीती आणि आश्चर्य एकत्रित करून प्रश्न आला.

"होय घरात येत नाय. घाबरू नको", ताई हसत सांगायला लागली.

"आपल्या घराच्या बाजूनं पण फिरतो रात्री बऱ्याच वेळा. मी बघितलाय स्वतः. आयेने पन बघितलाय", शैला ताईच्या या वाक्याला माईनी होकारार्थी मान हलवत दुजोरा दिला. ती एका बाजूला अडकित्यावर सुपारी कातरत होती. वाघाबद्दल सांगताना शैला ताई तीच काम सोडून वाघाची बसण्याची, इकडे तिकडे बघण्याची अँकटींग करून दाखवत होती. ते बघताना गम्मत वाटली. पण तो रात्रीचा घराच्या बाजूला येतो ऐकून भीतीसुद्धा वाटत होती.

"माणसाला नाय ओढलान अजून. फक्त कुत्री नेतो दिसली की. बाजूच्या घरातली नेलान. म्हणून जाळीत लावून ठेवतात ती आता. रात्री तो आला की एवढ्या जोरजोरान केकटतात की गाव जागवतील. त्यांच्या ओट्यात लय वेळा गेलाय. त्यांनी दरवाजाच्या फटीतन जवळून बघितलाय त्याला", ताईच्या कोकणी स्टाईलमध्ये हे सगळं ऐकताना भारी वाटत होतं. तिने तिचा एक किस्सा सांगायला सुरुवात केली ज्यात तिने जंगलात वाघाला पाच दहा फुटवरून पाहिलं होतं.

"पोर शालत गेलेली आनी मी बाजाराला गेलेलं. येताना एव्हड्या लांबन कशाला यायचं म्हणून मी जंगलाच्या एका शॉर्टकटन आलेय. आणि घराच्या वरच्या बाजूला उतरणीला असताना बघतेय तर हा माझ्यासमोर पाठमोरा उभा. माझं पाय लागलं लटपटायला. डोक्यावर पिशवी. पलालो तर पकडंल म्हणून मी जागेवरच राहीले. पण चप्पल थोडी निसाटली. त्यानं फक्त मान फिरवून माग बघितलान. मला वाटलं आता मुडदा पाडतोय माझा. पण काय नाय तसाच पुढं निघून गेला आपल्या वाटेनं. तो गेल्यावर पिशवी टाकून मी अशी पळालय सांगतंय की डायरेक घरात. मला खाऊन काय त्याला हाडच मिलाली असती अशी पन", एवढा गंभीर प्रसंग सांगून पण तीने शेवटी आपल्या काटक प्रकृतीवरून जोक केलाच. तिच्या जागी आपण असतो तर काय अवस्था झाली असती याची कल्पना करतानाही भीती वाटत होती. जंगल म्हटल्यावर साप विंचू तर यांना एकदम कॉमन होते. त्यांची पोरं लहान असताना विचू ओटीवर आला की खेकडा म्हणून नाचायची असं ती सांगत होती. शैला ताईंची मोठी मुलगी रुचा तिथून चार पाच मैल चालत शाळेत जायची. एवढ्या वाटेत लहान मुलाना वाघाची भीती नाही वाटत का? याच मला नवल वाटलं. पण घाबरून घरी बसल्यावर सगळंच ठप्प होईल म्हणून बिनधास्तपणा त्यांच्या अंगात आला होता. संध्याकाळी भावोजी समुद्रावर घेऊन गेले. काही वर्षांपूर्वी तिथे त्या किनाऱ्यावर देव मासा आला होता व तिथेच त्याने जीव सोडला. तरी तो किनाऱ्यावर आल्यापासून पुढचे सात दिवस जिवंत होता. त्याच्या हाडांचे अवशेष पण त्यांनी दाखवले. हे सगळं बघताना भारी वाटत होतं.

ताईच्या घरी लाईट होती. पण तिचा प्रकाश फक्त दरवाजापर्यंत. रात्री काळोखात दरवाजपर्यंतच जग आहे असं वाटत होतं. आणि पुढे फक्त मिट्ट काळोखच होता. प्रतिभा वाघाच्या भीतीने रात्रभर झोपलीच नाही. एकंदरीत वाघाचं प्रकरण सोडलं तर रोहिले आम्हाला खूप आवडल होत.

वाघांनी माणसावर केलेले हल्ले हे मी डिस्कवरीत पाहिले होते. संजय गांधी नॅशनल पार्कच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्त्यांमध्ये शिरलेल्या बिबट्याच्या बातम्याही खूप वेळा वाचनात आल्या. हा जंगलातला वाघ रोहिल्यात वस्तीत फिरत असताना एवढ्या व्यक्ती आजूबाजूला असताना का हल्ला करत नाही हा प्रश्न माझ्यासमोर होता. "वाघ म्हातारा झाला की तो माणसावर हल्ला करतो. कारण माणसासारखी सोपी शिकार दुसरी नाही.", एकदा दादाने मला सांगितलं होतं. ते खरं असेलही. पण जेव्हा माणूस वाघाच्या राज्यात घुसखोरी करतो तेव्हा तिथली त्याची शिकार माणूस नकळतपणे हुसकावून लावत असतो. शेवटी भुकेपोटी हा माणसावर हात टाकणारच. कोणत्याही प्राण्याला मग तो माणूस असो किंवा जंगली वाघ जेव्हा सोप्या पद्धतीने पोट भरण्याच ऑप्शन मिळत तेव्हा तो तिकडेच जातो. मग ते पाळीव कुत्रे असतील, गायी म्हशी असतील किंवा मग शेवटी माणूस. जनावरं बिथरली की हल्ला करणारच.

हल्ली आमच्या गावात आणि मामाच्या गावात रात्रीचे बिबटे वाडीत येतात असं ऐकलं आहे. आमच्या वाडीतली कुत्री त्यांनी नेली. एकदोन वासरंही नेली. माझ्या मामीच्या घराच्या मागच्या बाजूला असणारा प्लास्टिक पेपर जो दरवाजाऐवजी ऑप्शन म्हणून लावला होता तो बिबट्याने फाडला. आरडाओरडा झाला म्हणून तो तिकडून पळून गेला. आमच्याकडच्या गावातल्या जंगलात एका मोठ्या फॅक्टरीच मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे असं ऐकलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड व डोंगरफोडी चालू आहे. जंगल सोडून वस्त्यांमध्ये शिरण्याच या प्राण्यांचं कारण म्हणजे सोप्या पद्धतीने मिळणारी शिकार आणि माणसाने त्यांच्या घरात केलेलं अतिक्रमण. विकासाच्या नावाखाली त्यांचा बराचसा एरिया माणसाने काबीज केला आहे. मग आता त्यांच्याच घरातून त्यांना काढून वाघ रस्त्यावर आल्यावर अजून कुठे जाणार? तो तुमच्या घरी येणारच!

धन्यवाद
सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६


#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी